डेहराडून – शेतकरी आंदोलनामागे असणाऱ्यांना देश तोडायचा आहे. जस्टिस फॉर शीख्स सारख्या अमेरिकास्थित संघटना आणि 302 पाकिस्तानी ट्विटर हॅंडल्सकडून शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न होत आहे, असे आरोप उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी शनिवारी केले.
भाजपचे नेते असणाऱ्या रावत यांनी केंद्रीय कृषी कायद्यांचे जोरदार समर्थन केले. कृषी कायदे शेतकऱ्यांना कसे काय हानीकारक आहेत ते सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यास; कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांचेच नुकसान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारतातील शेतकऱ्यांचे भले होऊ नये असे काही अमेरिकास्थित संघटना आणि पाकिस्तानी हॅंडल्स चालवणाऱ्यांना वाटते.
शेतकऱ्यांचे सबलीकरण हा भाजपच्या विचारसरणीशी निगडीत भाग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचा साधा विचारही मोदी सरकार करू शकत नाही. भगवान हनुमानासारखी शक्ती आमच्याकडे असती; तर छाती फाडून आमच्या हृदयात शेतकऱ्यांबद्दल काय आहे ते आम्ही दाखवले असते, असेही रावत म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी शेतकरी आणि गरिबांच्या हितासाठी मोदी सरकारने आणलेल्या विविध योजनांचा उल्लेख केला.