माधव विद्वांस
जनकवी, ठाणे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पी. सावळाराम यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म कोल्हापूर जवळील येडेनिपाणी येथे 4 जुलै 1913 रोजी झाला.त्यांचे मूळ नाव निवृत्ती रावजी पाटील असे होते. विधान परिषदेचे सभापती वि. स. पागे यांनी ह. ना. आपटे यांच्या “उष:काल’ या कादंबरीतील “सावळ्यातांडेल’ या पात्रावरून त्यांना प्रेमाने “पी. सावळाराम’ हे नाव दिले. ते नावच नंतर रूढ झाले.
त्यांचे प्राथमिक शिक्षण येडेनिपाणी येथे झाले. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते कोल्हापूर येथे गेले. तेथे कविवर्य माधव ज्युलियन हे त्यांना प्राध्यापक होते.कॉलेजमध्ये असताना “सौंदर्य नसते रंगात। सौंदर्य असते अंतरंगात। उघडुनि पाही।’ या ओळी असलेली “काळा गुलाब’ ही कविता लिहिली. वर्ष 1943 मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर ते कुर्ला-मुंबई येथे रेशनिंग ऑफिसमध्ये रुजू झाले. वर्ष 1949 मध्ये “राघू बोले मैनेच्या कानात’ हे त्यांचे पहिले भावगीत एचएमव्हीने ध्वनिमुदित केले. “राम राम पावणं’ या चित्रपटाचे गीतलेखनही त्यांनी केले. गीत लेखनाला वेळ देता यावा यासाठी कुर्ल्याच्या रेशनिंग ऑफिसमधील सरकारी नोकरी त्यांनी सोडली. सुमारे 50 हून अधिक चित्रपटांच्या कथा-पटकथांचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या कवितेत भाव, भक्ती, कुटुंबातील संबंध हळुवारपणे गुंफले आहेत.त्यामुळे त्यांच्या सर्वस्पर्शी कविता पाहून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी त्यांना “जनकवी’ ही उपाधी दिली. कुसुमाग्रज असे म्हटले आहे, पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांद्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरातही पोहोचले आहेत.
पंढरपुरातील पुजाऱ्यांच्या विळख्यात अडकलेला विठोबा पाहून “पंढरीनाथ झडकरी आता पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठ्ठला’ हे गीत सुचले. “गंगा-जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गीतही सगळ्यांनाच भावले. सर्वच घरात हा प्रसंग येतोच. तीनच कडव्यांचे हे गीत हेलावून टाकते.
“गोड गोजरी लाज लाजरी’ या गीतातून लहान भावंडांचे आपल्या मोठ्या बहिणीचे कौतुकही दिसून येते’. “ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता’ या गीतातून ज्ञानदेव देवालाच गीता सांगतो ही किती उत्तुंग कल्पना, त्यातून मराठी व ज्ञानदेवाची थोरवी ध्वनित होते. “माझ्या शेतात सोनंच पिकतंय पानापानात लखलख करतंय साता समिंदराचं माणिक मोती’ या कवितेतून त्यांच्यातील मूळचे मातीशी असलेले नातेही दिसून येते. “पुत्र व्हावा ऐसा’, “नांदायला जाते’, “कन्यादान’, “सलामी’ आणि “बेरडाची अवलाद’ या चित्रपटांच्या कथाही लिहिल्या. 1982 सालच्या “गदिमा’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 1985 मध्ये जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले होते.