पिंपरी -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान वाचवायच असेल तर जात, पात, धर्म भेद सर्व विसरून एकत्र यावं लागेल. संविधान वाचले तरच डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत वाचेल. अन्यथा जात, प्रांत, धर्म, पंत असे भारताचे चार तुकडे पडतील. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे जागे व्हा, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बुधवारी (दि. 13) पिंपरीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे उपस्थित होते. यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले, महात्मा गांधी आणि बाबासाहेब यांचे दोन वेगवेगळे रस्ते होते. पण भारताला एका संविधानाची गरज होती तेव्हा ते कोण लिहू शकतं असा प्रश्न पडला होता. तेव्हा महात्मा गांधींनी डॉ. बाबासाहेबांना या समितीचे अध्यक्ष करावं, अशी सूचना नेहरूंना केली होती, असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
ओबीसी आरक्षणामुळे वंजारी, माळी यांची मुलं तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर झाली. प्रमोशन घेत आयएएस आणि आयपीएस पर्यंत पोचली. आरक्षण गेल तर काहीच मिळणार नाही. आगामी काळात ओबीसी लढले नाहीत तर बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत हळूहळृ कोसळताना दिसेल. आव्हाड म्हणाले, हळूहळू या संसदीय लोकशाहीला रामराम करण्याची वेळ भारतावर आली आहे. संविधान वाचविण्यासाठी तुम्हाला आणि मला सर्व भेद विसरून एकत्र याव लागेल.
बाबासाहेबांचा “तो’ सर्वात मोठा अपमान
संविधानाने संसदीय पद्धत ठरवून दिलेली आहे. मात्र सध्या संसदेमध्ये ज्या पद्धतीने बिले पास केली जातात, ते धोक्याचे आहे. शेतकऱ्याची तीन बिले संसदेत चार मिनिटांमध्ये पास करण्यात आली. तो बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा अपमान होता. बिल मांडताना त्यावर सखोल चर्चा होणे अपेक्षित आहे, असेही आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.