पुणे – पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरच्या वतीने येत्या 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन केले आहे. या लोकअदालतमध्ये तडजोडीसाठी आतापर्यंत 75 हजार 404 दावे ठेवण्यात आले आहेत. या दाव्यात आणखी वाढ होणार आहे.
ठेवण्यात आलेल्या दाव्यामध्ये 38 हजार 768 दाखलपूर्व, तर 36 हजार 606 हे प्रलंबित स्वरूपाचे दावे असल्याची माहिती पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशाने प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकअदालत होणार आहे.
याविषयी सोनल पाटील म्हणाल्या, लोकअदालतमध्ये तडजोडी योग्य फौजदारी, दिवाणी, धनादेश बाऊन्स, बॅंकेची कर्ज वसुली, कामगार वाद, वीज आणि पाणी देयक, कौटुंबिक दावे, मोटार अपघात न्यायप्राधिकरण, भू संपादन, महसुल,
वाहतुकीसंबंधीच्या तक्रारीचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. दावे तडजोड करण्यासाठी न्यायाधीश अथवा माजी न्यायाधीश, वकील आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्ती अशा तिघांचा पॅनेल असणार आहे.
मागील लोकअदालतला 54 पॅनेल होते. यावेळी त्यामध्ये वाढणार होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून पुणे दावे निकाली काढण्यात राज्यात अग्रेसर राहिले आहे.
ही परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या लोकअदालतमध्ये प्रलंबित स्वरूपाचे 44 हजार 614 दावे ठेवण्यात आले होते. त्यापैकी 16 हजार 645 दावे निकाली काढण्यात आले.
तर दाखलपूर्व स्वरूपाचे 10 लाख 22 हजार 119 दावे ठेवण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 4 हजार 532 दावे निकाली काढण्यात आले होते.
लोकअदालतमध्ये तडजोड केल्यास पक्षकारांचा वेळ, पैसा वाचतो. होणाऱ्या मानसिक त्रासातुन सुटका होते. तुलनेने लवकर न्याय मिळतो. तडजोडीनंतर दोन्ही बाजूकडील पक्षकार आनंदी असतात.
दोघांनाही जिंकल्याची भावना असते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी लोकअदालमध्ये दावे तडजोड ठेवण्यास प्राधान्य द्यावे. या सुविधेचा लाभ घ्यावा.
– श्याम चांडक, प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधी