अमरावती – आंध्रप्रदेशातील सर्व 24 मंत्र्यांना राजीनामे देण्याचे आदेश मुख्यमंत्री वाय.एस.जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत. उद्या (दि. 7 एप्रिल) राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तेंव्हा सर्व मंत्री आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत. सर्व मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा निर्णय रेड्डी यांनी घेतला आहे. त्यामुळे दिनांक 11 एप्रिलला नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले जाणार आहे.
या नवीन मंत्रिमंडळामध्ये नवीन चेहरे असणार आहेत. सध्याच्या मंत्रिमंडळातील किमान चार मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांची निवड पूर्णपणे जातीच्या निकषावर केली जाणार आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.
जगनमोहन रेड्डी यांनी 30 मे 2019 रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेंव्हा अडीच वर्षांनतर सर्व मंत्रिमंडळाची फेररचना केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते. विद्यमान मंत्रिमंडळाने 8 जून 2019 रोजी शपथ घेतली होती. नियोजित वेळापत्रकानुसार हे मंत्रिमंडळ 8 डिसेंबर 2021 पर्यंतच कायम रहाणे अपेक्षित होते. मात्र करोनाची साथ आणि अन्य काही कारणांमुळे मंत्रिमंडळाची फेररचना पुढे ढकलली गेली होती. तेलगू नववर्ष उगाडीनंतर ही फेरचना केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी गेल्याच महिन्यात जाहीर केले होते.
या मंत्रिमंडळाच्या फेररचनेबरोबर आंध्रातील नवीन जिल्ह्यांचीही निर्मिती केली जाणार आहे. या नवीन मंत्रिमंडळात अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, आदिवासी, मुस्लिम, मागासवर्गीयांबरोबर कप्पू समाजाला प्रत्येकी एक मंत्रीपद दिले जाणार आहे.