नगर – देशातील विरोधी पक्ष म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोर आहेत. या विरोधी पक्षांचे नेते कितीही एकत्रित आले, तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना हलवू शकत नाहीत. कारण मोदी हे भाजपचे नाही, तर देशाचे राष्ट्रीय नेते आहेत. तसा नेता विरोधकांकडे नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या या नेत्यांनी आधी त्यांचा नेता ठरवावा, असे आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.
भाजपतर्फे कोहिनूर मंगल कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात फडणवीस बोलत होते. या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ. प्रा. राम शिंदे, खा. डॉ. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, नगर शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षांच्या नेत्यांपैकी एकही राष्ट्रीय नेता नाही. सन 2019मध्येही हे सर्व एकत्र आले होते, परंतु त्या वेळीही काहीही फरक पडला नाही. मोदींना विरोध करणारे सर्व नेते हे राज्याचे नेते आहेत व ते राष्ट्रीय नेते बनू पाहत आहेत, परंतु त्यांनी आधी त्यांचा एकच नेता ठरवावा तरच त्यांना थोडीफार तरी मते मिळतील, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला. मागच्या सरकारने भ्रष्टाचार केला, त्यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले, त्यांच्यावर अनेक आरोप झाले.
मात्र, त्या पक्षाचे नेते स्वतःच्या पलीकडे पाहत नव्हते. त्यांचे मुख्यमंत्री घरात बसून होते व बाकीचे मंत्री स्वतःलाच मुख्यमंत्री समजून मनमानी कारभार करत होते, परंतु ही मनमानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपवून राज्यात नवे सरकार स्थापन केले. सध्या राज्यातील महाविकास आघाडी ही महावसुली आघाडी व महाविनाश आघाडी होती. सगळी खुर्चीला चिटकून बसली होती.
सत्तेतून पैसे कमवणे व पैशातून सत्ता मिळवणे हे त्यांचे चुंबक होते, पण तेच आम्ही हाणून पाडले आहे. अडीच वर्षांत त्यांनी एकही काम केले नसल्याची टीका त्यांनी या वेळी केली. या वेळी खा. डॉ. सुजय विखे यांनी स्वागत केले. जिल्हा भाजपद्वारे पालकमंत्री विखे यांच्या हस्ते चांदीचा विजय कलश फडणवीस यांना देण्यात आला. दिलीप भालसिंग यांनी सूत्रसंचालन केले. भैया गंधे यांनी आभार मानले.
जाणता राजा अस्तित्वाच्या शोधात : विखे
दुसरी-तिसरी अशा विरोधकांच्या कितीही आघाड्या होऊ द्या, पण आपली ताकद त्यांच्यापेक्षा निश्चितच जास्त आहे. आघाडी करता करता त्यांच्या तोंडाला फेस आला आहे व जाणता राजा स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात आहे, अशी शरद पवार यांचे नाव न घेता टीका करून मंत्री विखे म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व निवडणुकांतून भाजपला यश मिळवून जिल्ह्यात शत-प्रतिशत भाजप केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात लक्ष घाला : शिंदे
आ. प्रा. राम शिंदे यांनी फडणवीस यांना नगर जिल्ह्यात लक्ष घालण्याचे आवाहन केले. तुम्ही लक्ष घातले, तर जिल्ह्यात काहीही कमी पडणार नाही. सन 2019मध्ये दक्षिण नगर जिल्ह्यात भाजप-शिवसेनेचे चार आमदार होते व त्या वेळी आपण लोकसभा जिंकली, पण आता उलटे चित्र आहे. आपले दोन आमदार आहेत व चार विरोधात आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बूथ व मंडल स्तरावर झोकून देऊन काम करावे लागेल. संघटनात्मक बांधणी महत्त्वाची आहे व त्यामुळेच मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे स्वप्न साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.