सातारा -राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर सत्तापालट होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळले. साताऱ्याचे भूमीपुत्र असणारे माजी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करीत सत्तापालट घडवून आणला. या बंडाला जिल्ह्यातीलच आमदार शंभूराज देसाई व आमदार महेश शिंदे यांनी साथ दिली. भाजपच्या नव्या येऊ घातलेल्या सरकारमध्ये जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान मिळणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याचे राजकीय अंदाज वर्तवू जाऊ लागले आहेत.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यामुळे मंत्रिमंडळात जिल्ह्यातील किती जणांना संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. त्यात शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे बोसले, जयकुमार गोरे व महेश शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीत महत्त्वपूर्ण साथ दिली अशा जिल्ह्यातील आमदारांना मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही लाल दिवा मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली असून नवीन मंत्रिमंडळात सातारा जिल्हा चर्चेत राहणार असल्याचे चित्र आहे. शंभूराज देसाई यांचा पाटण तालुक्यामध्ये स्वतःचा असा मोठा गट असून कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे.
त्यामुळे ते शिवसेनेत आपले वेगळे वजन ठेवून होते. बंडाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपण शिवसैनिक असल्याचा दावा शंभूराज देसाई यांनी केला होता. कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे शिवसेना- भाजप युतीच्या जागावाटपामध्ये कोरेगावची जागा शिवसेनेला गेल्यामुळे शिवसेनेतून ते आमदार झाले. शिवसेनेचा तोंडवळा त्यांनी नावापुरताच ठेवून भाजपच्याच गोतावळ्यात रमणे अधिक पसंत केले होते. उद्धव ठाकरे यांच्याकडून निधी वाटपाच्या आणि अधिकारासंदर्भात योग्य तो न्याय न मिळाल्याची भावना प्रबळ झाल्याने या दोन्ही आमदारांनी शिंदे यांच्या बंडखोरीला साथ दिली.
आता सत्ताबदल झाल्यानंतर येऊ घातलेल्या मंत्रिमंडळात शंभूराज देसाई, महेश शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माणचे आमदार जयकुमार गोरे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे. शंभूराज देसाई यांना कॅबिनेट पद व महेश शिंदे यांना मंत्रिपद किंवा कृष्णा खोरे महामंडळ दिले जाऊ शकते. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचाही मोठ्या खात्यासाठी विचार केला जाऊ शकतो. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कौशल्याने अजित पवार आणि भाजपचे नेते यांच्यातील संतुलन साधले होते.
भाजपच्या सर्व प्रोटोकॉलमध्ये शिवेंद्रसिंहराजे यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली. अनेक संघटनात्मक कार्यक्रम आणि बांधणीमध्ये त्यांचाही वाटा राहिला. माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यामध्ये गेले तीन टर्म आमदारकीची पूर्ण केली असून राष्ट्रवादीविरोधात आक्रमक भऊमिका घेण्यात ते आघाडीवर असतात. त्यांना या मंत्रिमंडळ विस्तारात एखादे महत्त्वाचे खाते दिले जाऊ शकते. कोणाला कोणते खाते मिळणार, कोणाला लाल दिव्याचा मान मिळणार या वेगवेगळ्या चर्चेमुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.