अयोध्या – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता काहीच दिवस शिल्लक राहीले आहेत. सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. आपल्याला अद्याप या सोहळ्यासाठीचे आमंत्रण मिळाले नसल्याचे वक्तव्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर श्री रामजन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकालाच आमंत्रण दिले जाऊ शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सत्येंद्र दास म्हणाले, जे प्रभू रामाचे भक्त आहेत त्यांनाच निमंत्रण दिले जाते आहे. तसेच भारतीय जनता पार्टी भगवान रामाच्या नावावर निवडणूक लढत असल्याचे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. भारताच्या पंतप्रधानांचा सगळीकडे आदर केला जातो. त्यांनी आपल्या कार्यकाळात खूप मोठे काम केले आहे. हे राजकारण नाही तर त्यांची भक्ती आहे.
प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे लोकसभेतील नेते अधिर रंजन चौधरी यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. ही मंडळी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार का याबाबत कॉंग्रेसकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. तथापि, इतर अतिमहत्वाच्या व्यक्ती, साधु संत यांच्यासह ८ हजार जणांना आमंत्रण देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
निमंत्रण न मिळाल्याच्या संदर्भात बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की भाजप लोकसभा निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने राजकारण करते आहे. हा धार्मिक सोहळा असून त्याचा राजकारणासाठी उपयोग केला जायला नको. तो कोणत्या एका पक्षाचा कार्यक्रम आहे असे स्वरूपही त्याला यायला नको. मला मंदिराच्या दर्शनासाठी कोणाच्या आमंत्रणाची आवश्यकता नाही. मी मला हवे तेंव्हा तेथे जाऊ शकतो.
याला उत्तर देताना सत्येंद्र दास म्हणाले की विरोध करणारेही रामाच्या नावावरच निवडणुका लढतात आणि रामालाच विरोधही करतात. हे त्यांचे कोणते राजकारण आहे? दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही भाजपला लक्ष्य करताना खोचक टिप्पणी केली होती.
ते म्हणाले होते की रामाच्या नावाने एवढे राजकारण केले गेले आहे की आता भाजपकडून केवळ एकच गोष्ट करायची राहीली आहे. ती म्हणजे भगवान राम आमचे उमेदवार आहेत एवढेच जाहीर करण्याचे त्यांनी आता बाकी ठेवले आहे. भाजपने संपूर्ण कार्यक्रम एक प्रायव्हेट इव्हेंट करून टाकला आहे. त्यातून एकच सिध्द होते की हा राष्ट्रीय कार्यक्रम नसून भाजपचा खासगी कार्यक्रम आहे.