हैदराबाद – केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच केंद्रात सशक्त सरकार देऊ शकतात असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. हैदराबाद जवळील समशाबाद येथील एका जाहींर सभेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की पुलवामा येथे आपल्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानावर एअरस्ट्राईक करून त्यांना चोख उत्तर देण्याचे काम मोदींनी केले. असा चोख प्रतिसाद राहुल गांधी देऊ शकतात काय असा सवाल शहा यांनी केला. देशाला पुरवलेली भक्कम सुरक्षा हे मोदींचे सर्वात मोठे काम आहे असे ते म्हणाले. राहुल गांधी यांच्याकडे देशाला सक्षम नेतृत्व देण्याची क्षमता आहे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कॉंग्रेसचा उल्लेख त्यांनी तुकडेतुकडे गॅंग असा केला. भारताने पाकिस्तानवर एअरस्ट्राईक केल्यानंतर संपुर्ण देशात जल्लोष साजरा होत होता पण केवळ दोन ठिकाणी मात्र दुखाची छाया पसरली होती. त्यातील एक ठिकाण पाकिस्तानचे होते तर दुसरे ठिकाण राहुल गांधी यांच्या कॅम्पचे होते अशी टिपण्णी त्यांनी केली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की निवडणुकीनंतर देशात कशीही राजकीय परिस्थिती उद्भवली तरी चंद्रशेखर राव हे पंतप्रधान बनू शकत नाहीत. लोकसभेची निवडणूक ही पंतप्रधान निवडण्यासाठी असते त्यामुळे तेलंगणातील जनतेने मोदींच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले.