मंचर (पुणे) -आचारसंहिता संपताच मंचर नगरपंचायतीस परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंचर ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले. अशी माहिती भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांनी दिली.
मंचर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतीमध्ये व्हावे या मागणीसाठी मंचर ग्रामस्थांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार, राजाबाबू थोरात, जे. के थोरात, सुहास बाणखेले, लक्ष्मण थोरात, अल्लु इनामदार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आंबेगाव तालुक्यातील महत्वाचे व सर्वात मोठे शहर म्हणून मंचरची ओळख आहे. मागील दहा पंधरा वर्षांमध्ये मंचरचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. इंजिनिअरिंग कॉलेज, शैक्षणिक संस्था, आरोग्य सुविधा अशा विविध गोष्टी येथे आहेत.
या गोष्टींच्या उपलब्धतेमुळे मंचरची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेत सुविधा कमी पडत आहेत. सुविधा वाढवायच्या असतील तर ग्रामपंचायतीच्या कारभाराला मर्यादा आहे. त्यामुळे नगरपंचायत किंवा नगरपरिषद होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही सर्व मंचरकर, तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे आग्रह धरला की मंचरची नगरपंचायत झाली पाहिजे. यापूर्वी युतीचे सरकार होते, तेव्हाही वळसे पाटलांनी प्रयत्न केले आणि आता आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यामध्ये लक्ष घातले. तसेच शिवसेनेचे नेते शिवाजीराव पाटील यांनीही लक्ष घातले.
मंचरची वाढती लोकसंख्या व होत असलेला विकास पाहता मंचरच्या ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिका किंवा नगरपंचायतीमध्ये करावे अशी मागणी केली होती. आचारसंहिता संपल्यानंतर लगेच निर्णय घेऊन मंचर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे कॉंग्रेस आय पक्षाचे आंबेगाव तालुकाध्यक्ष राजू इनामदार यांनी सांगितले.
- मंचरसाठी कुठल्याही पक्षाच्या नेत्यात मतभेत नाही. आम्ही आज मंचरसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते मिळून विधानभवनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी तालुक्याचे आमदार व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील हे स्वतः आमच्याबरोबर उपस्थित होते. या संदर्भात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आचारसंहिता संपल्यानंतर दोनच दिवसात यासंदर्भात निर्णय होईल, असे आश्वासन दिले आहे.
–बाळासाहेब बेंडे पाटील, अध्यक्ष भीमाशंकर साखर कारखाना - मागील दोन-तीन महिन्यांपासून शिवसेनेचे संपर्कप्रमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मंचर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली. तालुक्याचे आमदार आणि कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रस्तावाला गती दिली. गेल्या एक महिन्यापासून तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार यांनीही यामध्ये लक्ष दिले.
-राजाराम बाणखेले, पंचायत समिती सदस्य शिवसेना