तांदळाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
उरुळी कांचन- उरुळी कांचन येथील आठवडे बाजारात आज कांदा तसेच तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात भडकल्याने सर्वसामान्य नागरिकांचे ऐन दिवाळीच्या तोंडावर तोंडचे पाणी पळाले आहे. उरुळी कांचन येथे दर रविवारी आठवडे बाजारात भरतो.
15 ते 20 गावांतील नागरिक भाजीपाला खरेदी व धान्य खरेदी करण्यासाठी येतात. मात्र, आज उरुळी कांचन बाजारात भाजीपाल्याची एक जुडी 10 रुपये तर चांगला कांदा 50 ते 60 रुपये होता. 40 रुपये किलोचा तांदुळ 45 रुपयांच्या पुढे होता. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगलीच झळ सोसावी लागली. बाजारात भाजीपालाची आवक कमी प्रमाणात झाली होती. तरीही भाजीपाला महाग असल्याने अनेक जण भाजीपाला खरेदी करीत नव्हते. याउलट अनेकजण कडधान्ये खरेदी करण्यासाठी प्राधान्य देत होते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने भाजीपाला तसेच कडधान्ये खराब झाल्याने सर्व वस्तुंचे बाजारभाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.