परतीच्या पावसातून वाचलेले पीक आले जोमदार
केडगाव – केडगाव परिसरात काही शेतकऱ्यांचे कांदा पीक जोमदार असुन बाजारभाव वाढल्याने शेतकरी समाधान असून यंदा शेतकऱ्यांना कांद्याची लॉटरी लागली आहे.
दौंड तालुक्यात चालू वर्षी परतीच्या पावसाने हाहाकार माजवला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतीत अजूनही पाणी साचलेले दिसत असुन वापसा येण्यासाठी किमान पंधरा दिवस वाट पहावी लागणार आहे. परंतु,पाण्याचे योग्य व्यवस्थापन करुन आणि पावसाचे साचलेले पाणी शेतीतून काढून काही शेतकऱ्यांनी कांदा पीक वाचवले आहे. सध्या, कांदा पिकाला चांगले दिवस असल्याने पावसापासून पीक वाचवलेल्या शेतकऱ्यांची चालू वर्षी चांगलीच चांदी होणार आहे.
किरकोळ आणि ठोक बाजारभाव समाधानकारक मिळत आहे. कांद्यांची नवीन लागवड करण्यासाठी रोपेही महाग असुन जास्त लागवड झाली नाही तर बाजारभाव चांगला राहून कांदा उत्पादक चालू वर्षी मालामाल होतील, अशी शक्यता आहे.