मंचर -मंचर बाजार समितीत कांद्याचे लिलाव गुरुवार (दि. 16) पासुन सुरू झाले असले तरी बाजारभाव समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊनचा फटका कांदा उत्पादकांनाही बसू लागला आहे. लॉकडाऊनच्या अगोदर 10 किलोसाठी प्रतवारीनुसार 100 ते 110 रुपये बाजारभाव मिळत होता.सद्यःस्थितीत 60 ते 85 रुपये बाजारभाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मंचर बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर 11 दिवसांनी गुरुवारी (दि. 16) बाजार समितीतील व्यवहार सुरू झाले. मंचर बाजार समितीत कांदा लिलाव गुरुवार, रविवार आणि मंगळवारी होतात. उन्हाळी कांदा काढून शेतकऱ्यांनी बराकीमध्ये ठेवला. त्यानंतर देशात करोनामुळे तालुका बंदी, जिल्हा बंदी, त्यानंतर राज्यबंदी झाल्याने वाहतूक बंद झाली.
पर्यायाने कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केली नाही. त्यानंतर पुन्हा 15 दिवसांनी कांद्याचे लिलाव सुरू झाले. 100 ते 110 रुपये किलो बाजारभाव मिळू लागले. ज्या शेतकऱ्यांकडे कांदा साठविण्यासाठी बराकी किंवा आर्थिक अडचण आहे, अशा शेतकऱ्यांनी कांद्याची विक्री केली.
त्यानंतर पुन्हा मंचर परिसरात करोनाचे रुग्ण वाढू लागल्याने व्यापारी, बाजार समिती यांच्या समन्वयातून पुन्हा बाजार समितीचे व्यवहार रविवार (दि. 5) पासून बंद ठेवण्यात आले. आता गुरुवार (दि. 16) पासून कांदा लिलाव सुरू झाले आहेत. सुमारे दोन हजार कांदा पिशव्यांची आवक झाली; परंतु बाजारभावात घसरण झाली असून, 10 किलोसाठी प्रतवारीनुसार 60 ते 85 रुपये बाजारभाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे हॉटेल, रेस्टॉरंट बंद आहेत. वाहतुकीअभावी परराज्यात कांद्याला मागणी नाही, त्यामुळे कांद्याचे बाजारभाव काही प्रमाणात गडगडले आहेत. व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त बाजारभाव देण्याचा प्रयत्न करावा.
-देवदत्त निकम, सभापती बाजार समिती मंचर