सातारा – पोलीस मुख्यालय ते शनिवार चौक हा मार्ग वाहतुकीसाठी दुतर्फा खुला करावा, या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी सोमवारी हातात फलक घेऊन जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नाराज व्यापाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
साताऱ्यात एकेरी वाहतुकीमुळे व्यापारीवर्गाची मोठी अडचण झाली आहे. साताऱ्यात ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे कर्मवीर पथ व राधिका रोडसह सेवा रस्त्यांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. पोलीस मुख्यालय ते शनिवार चौक हा मार्ग एकेरी झाल्याने पोवई नाक्याकडून सलगपणे खण आळी, जुना मोटार स्टॅंडकडे जाता येत नाही. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना व्यापाऱ्यांनी वारंवार निवेदने देऊनही कोणताच फरक पडलेला नाही.
त्यामुळे एकेरी वाहतुकीच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी सोमवारी निषेधाचे फलक दर्शवून तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवाळी सण तोंडावर असताना आधीच मंदीच्या फटक्याचा मार उद्योगधंदांना बसला आहे. त्यात खण आळीकडे जाण्यासाठी पोलीस मुख्यालय-बडदे बॅटरी, राजसपुरा पेठेतून राजपथावर यावे लागते. व्यापाऱ्यांची तसेच पादचाऱ्यांचीसुद्धा प्रचंड अडचण होत आहे. परिणामी नाराज व्यापाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला
आहे.