Manoj Jarange – राज्य सरकार मराठा आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
सरकार हा विषय प्रामुख्याने का घेत नाही, याच्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे, असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आंतरवाली सराटी येथील लाठीमाराबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केलेल्या एका घोषणेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गुन्हे मागे न घेतल्यास देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा उघडे पाडू, असा थेट इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे म्हणाले, माझा मराठा समाज गरीब असला, शेतात राबणारा असला तरी त्याचे सरकार, लोकप्रतिनिधीवर बारकाईने लक्ष आहे. एकदा २४ डिसेंबरची मुदत होऊन जाऊ द्या. मग पुढे महाराष्ट्रातला मराठा समाज काय आहे? हे त्यांना दाखवून दे.
सरकारने काय समजायचे ते समजावे. आमच्या संयमाची परिक्षा घेऊ नये. आमचे आंदोलन शांततेतच होईल, पण सरकारला पश्चाताप करावा लागेल, अशी काहीतरी कृती करू”, असेही ते म्हणाले
तसेच मंत्री छगन भुजबळ यांना सभा घेण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. भुजबळ घटनात्मक पदावर बसले आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने दंगलीची भाषा, कुऱ्हाडी-कोयत्याची भाषा करून राज्यात जातीय तेढ निर्माण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.