नागपूर – तिसरी लाट आलीच तर ती मुलांवर आघात करण्याची शक्यता कमी आहे. शिवाय इतरांसाठीही ती फार घातक ठरणार नाही. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी राहील. मात्र तिसरी लाट आली तर मधुमेह व इतर गंभीर आजार असणाऱ्यांनाच अधिक धोका होऊ शकतो, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
ओमायक्रॉनच्या आजवरच्या अभ्यासानुसार, ओमायक्रॉन सौम्य स्वरूपाचा आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली तरी त्यामुळे फार नुकसान संभवत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. शिवाय कोव्हिडचे हे चक्र न संपणारे आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला बुस्टर डोस घेण्याची गरज असल्याचेही अरबट यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील दाखल रुग्णांचा आभ्यास करण्यात आला होता. त्या अभ्यासाची पाहणी करून काढलेला निष्कर्षातून डॉ. अरबट यांनी ही माहिती दिली आहे. एकंदरीतच डॉ. अरबट यांनी दिलेल्या माहितीमुळे अनेक नागरिकांची चिंता कमी होणार आहे.