नवी दिल्ली -पुणेकर असलेला गोल्फपटू उदयन माने हा टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. आदिती अशोक आणि अनिर्बन लाहिरी यांच्यानंतर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार तो तिसरा भारतीय गोल्फपटू ठरला आहे. या यशाबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी त्याचे कौतुक केले आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी ताज्या क्रमवारीनुसार उदयन माने हा पात्र ठरला आहे. त्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तीन गोल्फपटू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. मी त्यांना शुभेच्छा देतो, असे रिजिजू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुणेकर उदयन मानेने नुकताच करोना लसीचा दुसरा डोस घेतला होता. एका वर्षभरात मानेने चांगली कामगिरी करताना एक स्पर्धाही जिंकली होती. याचा त्याला क्रमवारीत फायदा झाला आणि त्याने ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला.
ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची अनिर्बन लाहिरी आणि आदिती अशोकची ही सलग दुसरी वेळ असणार आहे. हे दोघेही मागील म्हणजेच 2016 मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळले होते. आदितीला रिओमध्ये चांगली कामगिरी करता आली नव्हती. यंदा मात्र दमदार कामगिरीचे तिचे लक्ष्य आहे.