ओखला की जनता ने करंट लगा दिया, अशी आप उमेदवाराची प्रतिक्रिया
नवी दिल्ली : शाहीनबाग आंदोलन ज्या मतदारसंघात सुरूआहे, त्या ओखला मतदारसंघात आपचे नेते अमानुल्ला खान यांनी भाजपाचे प्रतिस्पर्धी उमेदवार ब्रह्मसिंग यांच्या 70 हजार मतांनी 13 व्या फेरी अखेर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यातील एकाची निवड अशा टोकाच्या पतळीवर प्रचार नेलेल्या भाजपाचा शाहीनबागने पराभव केल्याचे मानण्यात येत आहे.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीकरांना अलीकडेच दिलेल्या सल्ल्याच्या अनुषंगाने खान यांनी पत्रकारांकडे “ओखला की जनताने करंट लगा दिया’, अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली. सुधारीत नागरिकत्व कायद्याला विरोधात (का) आंदोलन करणाऱ्यांविरूध्द केलेल्या वक्तव्यांना जनतेने लावलेली ही चपराक असल्याचे त्यांनी सांगितले. शाहीनबाग हे का विरोधातील निदर्शनाचे मूळ केंद्र आणि जामिया मिलिया इस्लामिया हे का विरोधातील आंदोलनाचे दुसरे महत्वाचे केंद्र ओखला मतदार संघात येते.
इतक्या रागाने बटन दाबा की त्याचा करंट शाहीनबागमध्ये बसेल, असे वक्तव्य अमित शहा यांनी अलीकडेच केले होते. त्या अनुषंगाने खान आणि आपचे नेते भाजपाने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा अरोप करत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी निदर्शक आणि दहशतवाद्यांना गोळ्या घाला, असे वक्तव्य केले होते.
राजकीय निरीक्षकांच्या मते, भाजपाचा धार्मिक ध्रुवीकरणचा प्रयत्न प्रचंड फसला आहे. त्यासाठी शाहीनबागने मार्ग दाखवला आहे. देशाच्या राजकारणावर याचा परिणाम होणार आहे. दिल्ली पाठोपाठ बिहार आणि प. बंगालमध्येही निवडणुका होत आहेत. केजरीवाल यांना दहशतवादी आणि शाहीनबाग आंदोलकांना बिर्याणी पुरवत असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न भाजपाने केला. तो त्यांच्या अंगलट आला.
एका 25 वर्षीय युवकाने एक फेब्रुवारीला शाहीनबागेत गोळीबार केला. त्याने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी नंतर तो आपचा सदस्य असल्याचे जाहीर केले, या घटना क्रमाकडेही राजकीय निरीक्षक लक्ष वेधत आहेत. त्याआधी दोन दिवस एका 17 वर्षीय तरूणाने जामिया मिलिया इस्लामिया येथे निदर्शकांवर गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली होती. त्यावेळी काही डझन पोलिस ते पहात उभे होते. याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.