मुंबई – गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली तशीच फूट आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडली आहे. अशात आज राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार यांनीही दावा सांगितला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असा सामना सध्या राज्यात सुरु आहे. या सगळ्यामध्ये आता छगन भुजबळ यांचे एक महत्त्वाचे विधान समोर आले आहे. शरद पवार यांनी भेटायला बोलावलं तर मी भेटून येईन असे म्हटले आहे. त्यासवबतच दोन-चार आमदार वगळले तर सगळे आमच्याच बाजूने आहेत असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत आहेत. वर्षभरापूर्वी जशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत फूट पडली तशीच फूट आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडली आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार बहुसंख्य आमदारांना घेऊन शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहेत.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर मोठ्या प्रमाणात खोक्यांचा वापर करण्यात आला, असा दावा वारंवार करण्यात येत होता. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अशाच प्रकारचा खळबळजनक दावा ठाकरे गटातील आमदार तसेच विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.