– संजय डोळे
रंगीला राजा हे नाटक प्रहसनाच्या अंगाने जाते. रंगतदार आणि खुमासदार कथेच्या आधाराने कुंडलिक केदारी या नाट्याचा पट मांडतात. लोकनाट्यातील रंजकता आणि प्रबोधन असे दोन्ही गुण ते हा नाट्य-प्रपंच मांडताना लक्षात घेतात आणि चटकदार संवादांच्या माध्यमातून कथानकाची खुमारी वाढवत नेतात. स्वतःचा मुलगा (युवराज विक्रमादित्य) आता उपवर झालेला आहे तेव्हा त्याचा विवाह करून द्यायची वेळ आलेली आहे, याची राजाला (लालसिंग) कल्पना आहे. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्नही सुरू आहेत. अशातच ते मंदाकिनी नावाच्या एका राजकन्येला पाहायला जातात. युवराज आणि मंदाकिनी दोघेही एकमेकांना आवडतात.
त्यांची पसंती होते. परंतु राजपुरोहित एक वेगळाच मुद्दा उपस्थित करतात. मंदाकिनीच्या पत्रिकेतील मंगळ युवराजांना घातक ठरत असल्याचे ते सांगतात. मात्र, त्याच वेळी मंदाकिनीची पत्रिका राजे लालसिंग यांच्याशी अतिशय सुरेखरीत्या जुळत असल्याचेही सांगतात. लालसिंग गोंधळात पडतात आणि अखेरीस मुलाचं लग्न ठरविण्यासाठी गेलेले असताना स्वतः त्या मुलीशी लग्न करून परततात. असा एक गमतीशीर तिढा केदारी नाटकात निर्माण करतात. एकीकडे मंदाकिनी आणि युवराज एकमेकांना पसंत करून बसलेले आहेत, तर आता युवराजांना त्याच मंदाकिनीला माता म्हणून स्वीकारावे लागले आहे.
युवराज विक्रमादित्य हे पात्र कुंडलिक केदारी यांनी मोठे सुरेख योजले आहे. त्याच्या निष्ठा नेक आहेत. तो चारित्र्यसंपन्न आहे. बदललेली परिस्थिती आणि नातं त्यानं मोठ्या धीरानं स्वीकारलेलं आहे; परंतु मंदाकिनी मात्र विक्रमादित्यावर आलेलं मन आवरू शकत नाही. ती त्याला भुलवू पाहातेच; तथापि, तो दाद देत नाही. दुसरीकडे राजा लालसिंग युवराजासाठी दुसरी एखादी राजकन्या शोधतोच आहे.
त्याला ती मिळते का? मंदाकिनीचे व्यभिचारी मन कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते? तिच्या मनाचा थांग राजा लालसिंगला लागतो का? अशा प्रश्नांची उकल केदारी नाटकाच्या उत्तरार्धात करतात. तो उत्तरार्ध स्वतः नाटक वाचून (खरे तर पाहून) समजून घेण्यातच मौज आहे.
या पात्रांखेरीजही नाटकातील शिपाई आणि हवालदार ही दोन पात्रे प्रत्येक प्रसंगात एक वेगळीच मजा आणतात. प्रत्येक घटनेवरील त्यांची टिप्पणी अतिशय मार्मिक पद्धतीने भाष्य करते, आणि नाटकाला एक वेगळेच परिमाण प्राप्त करून देते. कुंडलिक केदारी यांनी हे नाटक तसे अतिशय मोकळे ठेवले आहे. मोकळे अशा अर्थानी की शिपाई आणि हवालदार या पात्रांच्या माध्यमातून विद्यमान राजकीय, सामाजिक परिस्थितीवर खुमासदार पद्धतीने भाष्य करता येईल, असा एक मोकळेपणा त्यांनी जाणीवपूर्वक या दोन पात्रांच्या बांधणीत ठेवलेला आढळतो, त्यामुळे कोणत्याही काळात या नाटकाचे नावीन्य व ताजेपणा टिकून राहील याची ग्वाही मिळते. रंगमंचावरील प्रयोगांत हे नाटक खुलून येईल यात तिळमात्र संदेह नाही, मुळातच केदारी या माध्यमांशी संलग्न असल्याने या संहितेला प्रयोगमूल्य ठेवण्यात ते यशस्वी झालेले दिसतात.