निसर्ग आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं योजक, कल्पक, बुद्धिमान आहे. वरवर पाहता तो मुक्त, स्वच्छंदी आणि बंधनरहित वाटतो, पण त्याच्या इतका वक्तशीर, विहितकर्म, करणारा कोणीच नाही प्रत्येकाच काम त्याने नेमून दिलेलं आहे. पाखरांना प्रमाण वेळीच आपलं घरटं सोडून बाहेर पडावंच लागतं. सूर्यास्तावेळी परत यावंच लागतं. हे बंधन नाही तर काय आहे? हा नियम कसा पाळला जातो. हे सगळं पाहिल्यावर निसर्गाचं एक वेळापत्रक असल्याचं जाणवतं. सागर कितीही मोठा असला तरी किनाऱ्याचे बंधन तो मान्य करतोच ना!
बंधनाला खूप प्रकार आहेत. एक बंधन, दोन रक्षाबंधन, तीन गाठबंधन आणि एक अनुबंध! हे सारे बंधनाचे प्रकार आपल्याला लागू होतात. वाहता वारा, जंगलातील झाडं, मुक्तपणे डोंगरदऱ्यातून अवखळपणे वाहणारे झरे, धबधबे, नद्या बंधनरहीत आहेत. आकाशात उडणारे पक्षी देखील मुक्त आहेत. स्वच्छंदी आहेत. कधीही त्यांना बघावं तर ते मुक्त वाटतात. एक निसर्गाचा अबोल पण मुक्त भाग वाटतात. हा सगळा भाग म्हणजेच निसर्ग म्हणा, सृष्टी म्हणा ती बंधरहित जरूर आहे, पण सुक्ष्मपणे पाहिलं तर, त्यांच्या स्वच्छंदीपणात कमालीची सूत्रबद्धता असते. पक्षी आकाशात उडतात तेव्हा त्यांचं एक फॉर्मेशन असतं. मध्यभागी एक पक्षी आणि दोन समान रांगात बाकीचे पक्षी. यामध्ये तो दुसऱ्याचा, हा माझा असा भेदभाव ते करीत नसावे. यामध्ये नवशिके पक्षी असतात. त्यांना अनुभवी पक्ष्यांकडून संरक्षण मिळते. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी पक्षी आनंदाने निभावतात. त्यांच्या स्वच्छंदी दिसण्यातला हा अनुबंधच असतो! त्यातही एक अर्थपूर्णता आहे.
आपण स्वत:ला त्यांच्यापासून म्हणजे निसर्गापासून वेगळे कल्पून आहोत का? मला वाटतं, आपण मानवानं स्वत:च्या बुद्धीचा वापर करून मानवजातीला वेगळे केले आहे. आजही ते निसर्गाचा भाग आहेत. आपण मात्र निसर्गापासून दूर गेलेलो आहोत. जरा विचार केला तर, खरी गोष्ट लक्षात येईल. आपल्याला त्यांचं हे बंधमुक्तपण वाटत असलं तरी ते त्यांना बंधनकारकच आहे. तेच त्यांचे विहित कार्य देवानं म्हणा अथवा निसर्गानं म्हणा निश्चित केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपला जीवनक्रम निश्चित आहे, ठरविलेला आहे, आखून दिलेला आहे, तो आपल्याला बंधनकारक वाटतो, मग निसर्गाचा पक्ष्यांचा जीवनक्रमही देवानेचं ठरविलेला आहे आणि वरवर विमुक्त वाटणारा असला तरीही तो बंधयुक्त आहेच ना! तेही आपल्याकडे पाहून आपण जसा त्यांच्याबद्दल विचार करतो, हेवा करतो, तेही आपल्याविषयी असाच विचार करत असतील का? हा प्रश्न निश्चितच विचार करायला लावणारा आहे!
मला वाटतं त्यांचा हेवा न करता त्यांच्याशी एक अनुबंध नव्यानं बांधुया. सहसा निसर्गक्रम बदलत नाही. पण काही वेळेला ते अनावर होतात. बंधनात राहणाऱ्या निसर्गाचं बेफान होणं, त्याचा विहितक्रम मोडून अनावर होणं आपल्याला परवडण्यासारखं मुळीच नाही. निसर्ग कोपला की होणारी हानी अपरिमित असते. याचं मूर्तिमंत उदाहरण केदारनाथ! आजही त्यातून सावरले जाणे कठिण आहे. हजारो लोक आजही बेपत्ता आहेत. आमच्या ओळखीत एक कुटुंब होतं.
आई, वडील आणि दोन मुले! त्या अपघातात आई-वडील दोघेही बेपत्ता आहेत. अजूनही काही ठावठिकाणा नाही. मुलं तेव्हा लहान होती. आज मोठी झालीत पण काही जखमा काळही भरू शकत नाही. प्रचंड हानी झाली. त्याचं प्रलयंकारी रूप फारच भयानक होतं! जणू हजारो वर्षांचं शहाणपण, देवानं घातलेलं बंधन, स्वत:चा मर्यादाशीलपणा ह्याचा विसर पडून, सारं काही झुगारून तो मूळ रूपात प्रकटला! अशा कधीतरी घडणाऱ्या घटना. आपल्या विहित कार्याच्या बाहेर जावून त्याचं बंधमुक्त होणं, केवढा उत्पात घडवतो हे आपल्याला ठाऊक! म्हणून असं वाटतं, निसर्गानं आपल्याला न दिसणारं विहितकार्यच एक अदृश्य असं गठबंधन निश्चितच आहे.
एक बहिणभावाचं रक्षाकवच रूपी रक्षाबंधन असतं. मी तुझ्या पाठीशी आहे, कोणत्याही संकटात तू एकटी नाहीस! असा दिलासा देणारं बंधन. ज्याचं बांधलेपण प्रत्येक काळात प्राणपणानं पाळलं गेलं. राणी कार्मावती आणि बादशहाची गोष्ट आजही ज्ञात आहे. हे एक प्रकारचं मानलेलं बंधन आहे. कोणत्याही परिस्थितीत ते जीवापाड जपलं जातं! जाचक असलेलं प्रेमाच बंधन. मानवी भावनाविष्काराचं एक सुंदर बंधन! जे राजाला प्रजेसाठी बंधनकारक असते. रक्षण करणारा तो पालनहार, असा या रक्षाबंधनाचा अर्थ. या रक्षाबंधनाने केवढाले इतिहास घडविले. कधी राजकीय पार्श्वभूमी तर कधी वेगळ्या विचित्र भावनातून सोडवणी. यासाठी याचा उपयोग केला गेलेला आहे.
पतीपत्नीचं साताजन्माचं बंधन हा एक भावनांचा मजेशीर घोळ आहे. पहिली गोष्ट अशी की खरंच सात जन्माचं बंधन असतं का? आपल्याकडे विवाह संस्कारात याचा वारंवार विचार केला जातो आणि आजकाल दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका या सातजन्माच्या बंधनावर अनेक एपिसोड खर्च करतात.
स्त्रिया मनात नसलं तरी देखाव्यासाठी का होईना जन्मोजन्मी हाच पती मिळो म्हणून व्रतांच्या बंधनात स्वत:ला अडकवितात. या सात जन्माच्या बंधनाला मग घटस्फोटाचं वळण का लागतं. सारेच प्रश्न अनुत्तरित असतात. बंधनच हवं असेल तर तो प्रेमाचा अनुबंध असावा. कोणत्याही नात्यांच्या बंधनात न अडकणारा मुक्त अनुबंध असावा. यावर पुन्हा नव्यानं विचार करण्याची गरज आहे. हा सारा मानवी भावभावनांचा खेळ आहे. जितके आपण बंधनात जखडलो आहोत किंवा आपल्या आखून दिलेल्या जीवनक्रमाला बंधन मानतो तो सारा मनाचा कमकुवतपणा आहे. बंधन न मानता बंधनात राहणं, हाच खरा निसर्गक्रम आहे.
निसर्ग आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं योजक, कल्पक, बुद्धीमान आहे. वरवर पाहता तो मुक्त, स्वच्छंदी आणि बंधनरहित वाटतो. पण त्याच्या इतका वक्तशीर, विहितकर्म करणारा कोणीच नाही. प्रत्येकाचं काम त्यानं नेमून दिलेलं आहे. पाखरांना प्रमाणवेळीच आपलं घरटं सोडून बाहेर पडावं लागतं. सूर्यास्तावेळी परत यावंच लागतं. हे बंधन नाही तर काय आहे? पाखरं घरट्यातून उडून गेल्यावर वापस घरट्यात परतत नाहीत. हा नियम कसा पाळला जातो? हे सगळं पाहिल्यावर निसर्गाचे एक वेळापत्रक असल्याचं जाणवतं. सागर कितीही मोठा असला तरी किनाऱ्याचं बंधन तो मान्य करतोच ना!
नद्या, जंगल, पर्वत हे देखील एक सुनियोजित क्रमानंच चालतात. पानगळीच्या दिवसात झाडांची वाळकी पानं गळतात, त्याजागी नवीन पानं येतात. आज हजारो वर्षं झालीत याच नियमानं ते होतं असतं. नाहीतर आज वृक्षांचा पर्णभार किती पटीनं वाढला असता. सागर उन्मत्त झाल्यावर काय परिणाम होतात, ते आपल्याला ज्ञात आहे. पृथ्वी क्षमाशीलतेचं जिवंत उदाहरण आहे. ही सुद्धा निसर्गानं घातलेली बंधरेषा आहे आणि शक्यतोवर पृथ्वी ही रेषा ओलांडत नाही. कधी अनावर होवून बंधमुक्त होवून, ती जो उत्पात घडवून आणते, तो विश्वसंहारक असतो. आपल्या भोवतीची पंचहाभूतं आहेत. ती वरवर पाहता बंधरहित वाटतात. ती बंधरहित असूनही बंधनातच आहे. मुक्तपण हेच त्यांचं बंधन आहे.
सारा निसर्ग मानव यांच्यातला संवाद हा एक सुंदर अनुुबंध आहे. जो ज्याला समजला, कळाला तो त्याच्याशी प्रेमानं जोडला जातो. एक सुसंवाद साधला जातो. मग केवळ निसर्गप्रेमी असं लेबलं न लागता खरोखरंच आपण निसर्गाच्या प्रेमात पडतो. ज्याची इर्ष्या केली तरी जे संपत नाही… जे सर्व चराचरात व्यापून आहे… ते प्रेमबंध कधीच तुटत नाहीत. ते मुक्त आहेत, मजबूत आहेत. नात्यांचं बंधन असूनही ते बंधरहीत आहेत…. ते सूर्यप्रकाशासारखे सर्वांगी आपल्या कवेत घेत असतं ते प्रेम! ज्याच्यावर एका ठराविक कुणाचा हक्क नाही. जे हा माझा हा तुझा हा भेद मानीत नाही. ज्याचं दुसरं नाव भूतदया आहे. जे सर्वांना परमेश्वरापाशी पोचवू शकतं… ते बंधरहित प्रेमबंधन आहे.
– अरुणा सरनाईक