नवी दिल्ली – ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत २७८ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. काही मृतदेहांची ओळख पटण्यात अनेक अडचणी येत असलयाचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. तसेच अनेकजण एकाच मृतदेहावर दावा करत आहेत. तथापि, भुवनेश्वर एम्सचे म्हणणे आहे की त्यांनी या समस्येचा सामना करण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग सुरू केले आहे. दावा करणाऱ्या कुटुंबीयांकडून 10 डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.
एम्सचे उपअधीक्षक डॉ. प्रवाह त्रिपाठी यांनी सांगितले की, 278 मृतदेहांपैकी 177 मृतदेहांची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आली आहे. आम्हाला 123 मृतदेह सापडले होते. यापैकी 64 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 101 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेह खराब होऊ नयेत म्हणून मृतदेह पाच वेगवेगळ्या विशेष डब्यात ठेवण्यात येणार आहेत.त्यामुळे हे मृतदेह तब्बल सहा महिन्यापर्यंत राहू शकतात.
बालासोर दुर्घटनेचे आतापर्यंतचे अपडेट्स
ओडिशाच्या बालासोरच्या बहनगा मार्केटमध्ये शुक्रवारी रेल्वे अपघात झाला. रेल्वेने मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि इतर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओडिशात पोहोचले होते.पंतप्रधानांनी जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईल असेही ते म्हणाले.