मुंबई- राज्य सरकारच्या हातात दहा महिन्यांचा अवधी होता. मात्र त्यांनी काहीही केले नाही. फक्त केंद्र केंद्र करत होते. त्यामुळे या सर्व परिस्थितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, अशी टीका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
ते म्हणाले, की ओबीसींचा प्रश्न संसदेमध्ये मांडून काय उपयोग? सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करून निवडणुका होणे हा एकमेव पर्याय आहे. 105 नगरपालिका निवडणुका तोंडावर आल्यात, मात्र सरकारने इंपेरिकल डाटा गोळा केला नाही, असा आरोप त्यांनी केला.
अजित पवार, विजय वडेट्टीवार या नेत्यांनी काहीही केले नाही. त्यामुळे तेच दोषी आहेत. यांनी एक छदामही दिला नाही. त्यांना राजकारण खेळायचेय. ते समाजाची फसवणूक करत आहेत. झटपट सर्व्हे सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. आता न्यायासाठी आम्ही रस्त्यावर ऊतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात ओबीसी समाजाचे नेतेसुद्धा काही काम करत नाहीत. मुख्यमंत्र्यांनी यात मध्यस्थी करावी, ओबीसी उपसमिती बरखास्त करावी, आम्हाला वेळ द्यावा, त्वरीत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.