ढाका, नायपितॉ – रोहिंग्या निर्वासितांविरोधात द्वेष पसरवणाऱ्या भाषणांना न रोखल्याबद्दल काही रोहिंग्यांनी फेसबुकवर तब्बल 150 अब्ज डॉलरचा दावा ठोकला आहे. फेसबुकने हे द्वेष पसरवणारे व्हिडीओ न रोखल्यामुळेच रोहिंग्यांविरोधात हिंसाचार भडकल्याचा दावा या रोहिंग्यांनी केला आहे.
2017 मध्ये म्यानमारमधील रोहिंग्यांना तेथील लष्कराने केलेल्या कारवाईत देश सोडून बांगलादेशात आश्रय घ्यावा लागला आहे. म्यानमारमधून निर्वासित झालेल्या या रोहिंग्यांची संख्या 7 लाखांच्या आसपास आहे.
यावेळी रोहिंग्याविरोधात सामुहिक हत्या आणि बलात्कारासारखे गुन्हेही घडल्याचा आरोप आहे. संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेनेही रोहिंग्यांच्या विरोधातील ही कारवाई म्हणजे वांशिक हिंसाचार असल्याचे म्हटले होते. मात्र या हिंसाचाराला फेसबुकवरील द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट जबाबदार असल्याचा दावा कॅलिफोर्नियातील न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
ब्रिटीश वकिलांनीही लंडनमधील फेसबुकच्या विरोधात एक खटला दाखल केला आहे. ज्या देशांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या साहित्यामुळे हिंसा भडकू शकते, अशा ठिकाणच्या पोस्टना फेसबुकने कोणताही अटकाव घातला नाही, असा दावा यामध्ये करण्यात आला आहे. म्यानमारच्या सैन्याने बनावट फेसबुक अकाउंट करून काही बनावट व्हिडीओ प्रसारीत केले होते. त्यातूनच या हिंसेला चिथावणी दिली गेली, असे या दाव्यांमध्ये म्हटले आहे.