पुणे – करोना काळात हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसला आहे. निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रवासी हवाई वाहतूक करणाऱ्या विविध खासगी कंपन्यांनी प्रवाशांसाठी योजना आणल्या. याचाच परिणाम म्हणून या महिन्यांत मुुंबई तसेच पुणे विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांतून देशांतर्गत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली.
देशभरातील विमानतळांवरून रविवारी (दि.17) तब्बल 4 लाख 50 हजार पेक्षा अधिक प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. करोनापूर्व काळापेक्षा सध्या देशांतर्गत नागरी उड्डाणांची संख्या वाढू लागली आहे. गतवर्षी याच कालावधीत एअरलाइन्सची दररोज 2,600 उड्डाणे होत होती. यात सुमारे 3,50,000 प्रवाशांनी प्रवास केला होता.
देशांतर्गत वाहतुकीसाठी सरकारने सध्या 85 टक्के क्षमतेने प्रवासी वाहतुकीची परवानगी कंपन्यांना दिली आहे, तर दुसरीकडे फेअर बॅंडची (कमाल व किमान) मर्यादा 15 दिवसांसाठीच असते. या वेळमर्यादेनंतर एअरलाइन्स आपल्या सोयीने भाडे ठरवू शकते, अशा काही सुविधांतून गेल्या काही महिन्यांत प्रवाशांना आकर्षित करण्यात विमान वाहतूक कंपन्या यशस्वी ठरल्या आहेत.
प्रवासी क्षमतेच्या निश्चित मर्यादेपेक्षा कमी तिकिटे विकण्याची सूट विमान वाहतूक कंपन्यांना मिळाल्यानंतर देशांतर्गत विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. 15 दिवसांच्या मर्यादेनंतर एअरलाइन्सला 30-40 टक्क्यांपर्यंत स्वस्त तिकिटे विकण्यासाठी भरपूर वेळ मिळतो. याच कारणातून विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे मानले जात आहे.