मुंबई – राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रकल्प हे आपले वैभव आहे. हे वैभव जगापुढे येणे आणि पर्यटकांना त्याठिकाणी आकर्षित करण्यासाठी या सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या सोयीसुविधांमध्ये एकसूत्रता आणणे गरजेचे आहे. त्यासाठी पाचही व्याघ्र प्रकल्पांचा एकत्रित पर्यटन आराखडा तयार करावा, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. त्याचप्रमाणे वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंसाठी यापुढे “वनामृत” हा एकच ब्रँड वापरण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
राज्यातील व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार झाली. त्यावेळी ते बोलत होते. वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर आणि महिप गुप्ता यांच्यासह ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, पेंच-बोर व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, आणि नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुनगंटीवार म्हणाले, पाचही व्याघ्र प्रकल्पाचा पाच वर्षासाठी एकत्रित पर्यटन आराखडा तयार करण्यात यावा. एखाद्या व्याघ्र प्रकल्पात अभिनव उपक्रम राबविले गेले असतील तर त्याची इतर ठिकाणी अंमलबजावणी करता येईल का, याचा विचार व्हावा. व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण त्याठिकाणी राहील, हे पाहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.
राज्यातील व्याघ्र प्रकल्पांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा, सेल्फी पॉईंटसची निर्मिती करावी. तेथील परिसरातील गावातील घरांच्या भिंतीवर वन्यजीव आणि पर्यावरणपूरक चित्रे रंगवून अधिकाधिक वातावरण निर्मिती करावी. स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मितीसाठी कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, येथील महिला- युवक यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळेल, यासाठी प्रयत्न करणे, व्याघ्र प्रकल्पाद्वारे निर्मित वस्तू्ंचे योग्य ब्रॅंडिंग होईल, त्यामध्ये एकसमानता असेल, याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.