अमोल पवार
कोविड महामारीचा परिणाम उत्पादनावर पडला आहे. जागतिक तापमानवाढ आणि जलवायू परिवर्तन या संकटांनी यावर्षी पिकांची हानी केली आहे. मागणी वाढत आहे; परंतु आता कामगारांची कमतरता जाणवू लागली आहे. हवामान बदलांच्या झळा संपूर्ण जगाने महामारीबरोबरच सहन केल्या असून, त्यामुळेच सर्वत्र महागाई वाढत आहे.
काही आठवड्यांपूर्वीची गोष्ट. लाखो टन माल असलेली जहाजे विक्रमी संख्येने अमेरिकेच्या सर्वांत जास्त वर्दळ असलेल्या बंदरासमोर ओळीने उभी होती. एकीकडे अशा प्रकारे माल उतरवून घेण्यासाठी बंदरासमोर जहाजे एका पाठोपाठ एक उभी राहून अनेक आठवडे वाट पाहत होती, तर दुसरीकडे अमेरिकेतील दुकानांमध्ये मालाचा तुटवडा जाणवत होता. ही परिस्थिती एकट्या अमेरिकेची नव्हती तर अनेक देशांमध्ये हीच परिस्थिती होती.
आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि व्यापारी संघटनांनी असा इशारा दिला की, परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतील. या आठवड्यात जगातील अनेक देशांना हाच प्रश्न पडला आहे तो असा, की संपूर्ण जगात एकाच प्रकारची टंचाई का जाणवत आहे? परिस्थिती रुळावर येण्यास आणखी किती काळ जाईल? काही तज्ज्ञांनी त्यांची मते मांडून या परिस्थितीचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला.
बर्नस्टीन रिसर्च या संस्थेत व्यवस्थापकीय संचालक आणि वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करणारे स्टेसी रॅसगन हे अमेरिकेतील सेमी कंडक्टरच्या बाजारपेठेवर नजर ठेवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, जागतिक स्तरावर एक वेगळ्याच प्रकारचा “ट्रेन्ड’ दिसून येत आहे. उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची कमतरता आहे आणि त्यामुळेच नव्याने तयार झालेला माल बाजारात येत नाही आणि दर वाढत जातात.
याचा मोठा परिणाम मोटारींच्या बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे. एक मायक्रोकंट्रोल चिप केवळ 50 पैशांना मिळते; मात्र 50 हजार डॉलर किंमत असलेली मोटार या चिपशिवाय तयार होऊ शकत नाही. यावर्षी सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे 10 लाखांहून अधिक मोटारी तयारच होऊ शकल्या नाहीत आणि वाहन उद्योगाला 200 अब्ज डॉलर एवढे नुकसान सहन करावे लागले.
स्टेसी यांच्या म्हणण्यानुसार, करोना काळात “वर्क फ्रॉम होम’ आणि “स्टडी फ्रॉम होम’चे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे बाजारपेठेत पर्सनल कॉम्प्युटर्सची मागणी अचानक वाढली. संपूर्ण यंत्रणेसाठी हा मोठा झटका होता. 2020 मध्ये सुमारे 30 कोटी पर्सनल कॉम्प्युटर्स विकले गेले. 2022 पर्यंत 34 कोटी पर्सनल कॉम्प्युटर्सची विक्री होईल आणि हाच ट्रेन्ड 2025 पर्यंत कायम राहील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दहा वर्षांपासून पर्सनल कॉम्प्युटर्सची बाजारपेठ रोडावत चालली होती. परंतु महामारीमुळे या बाजाराने अचानक उसळी घेतली आहे. एका बुडत चाललेल्या व्यवसायात अचानक एवढी तेजी येईल, याचा अंदाज सेमी कंडक्टर उत्पादकांना नव्हता. ते या उद्योगासाठी उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही कंपन्या महामारीपासून धडा घेऊन आधीपासूनच चिप्सचा साठा करून ठेवत आहेत.
स्टेसी म्हणतात की, महामारीच्या प्रारंभापासूनच उत्पादनावर परिणाम जाणवू लागला आणि अजूनही परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. अनेक कंपन्यांना चिप्सच्या ऑर्डर दिल्यानंतर जवळजवळ वर्षभर वाट पाहावी लागत आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लागण्याचीही शक्यता आहे.
संपूर्ण जगभरात मालाची टंचाई का जाणवू लागली आहे, या आपल्या मूळ प्रश्नाकडे आता वळूया. कोविड महामारीचा परिणाम उत्पादनावर पडला आहे. त्याचप्रमाणे जागतिक तापमानवाढ आणि जलवायू परिवर्तन या संकटांनी यावर्षी पिकांची हानी केली आहे. डॉ. नेला रिचर्डसन या एडीपी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत. त्या असे म्हणतात की, महामारीच्या काळात किराणा मालाच्या दुकानांत मालाची कमतरता होती.
दुकानदार मर्यादित स्वरूपातच माल खरेदी करीत होते. आता लॉकडाऊन मागे घेतला गेला आहे आणि लोक घराबाहेर पडू लागले आहेत. त्यांची मागणी वाढू लागली आहे. परंतु आता कामगारांची कमतरता आहे. उत्पादनापासून पुरवठा आणि वाहतूक अशा सर्वच क्षेत्रांत कामगारांची मोठ्या प्रमाणावर चणचण आहे. श्रमबाजार ही सध्याची मोठी समस्या आहे, असे म्हणता येते.
गेल्या वर्षी तसेच यावर्षीही संपूर्ण जगाने महामारीबरोबरच जलवायू परिवर्तनाचे दुष्परिणामही सहन केले आहेत. जगाच्या अनेक भागांमध्ये पिके बरबाद झाली आहेत. अतिवृष्टी आणि वादळांनी भारतात भाज्यांचे नुकसान केले तर अमेरिकेत चक्रीवादळाने कपाशीची शेती नष्ट केली. ब्राझीलमध्ये हिमवृष्टीमुळे कॉफीच्या शेतीचे अपरिमित नुकसान झाले.
गेल्या वर्षी ब्राझीलमधील कॉफी पिकविणाऱ्या भागात भीषण दुष्काळ पडला आणि 30 टक्के पिके नष्ट झाली. दुष्काळामुळे तर किमती वाढल्याच; परंतु त्यापाठोपाठ झालेल्या हिमवृष्टीने परिस्थिती आणखी गंभीर बनली. वाहतूक व्यवस्थेत मनुष्यबळाचा असलेला अभाव हाही सध्याच्या जागतिक महागाईला कारणीभूत ठरला आहे.