– आरिफ शेख
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी थेट लष्करी कार्यालयावर हल्ले केले आहेत. समर्थकांनी देशभर धुडगूस घातला आहे.
इस्लामाबाद उच्च न्यायालयाबाहेर पाक रेंजर्सनी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक केली. त्यांना कॉलर धरून खेचत नेले. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखी वागणूक त्यांना देण्यात आली. इम्रान खान यांच्यावर विषप्रयोग केल्याची भीती त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या गाडीला घेराव घालण्यात आला होता. दुसरीकडे “पीटीआय’शी संबंधित नेते अझहर मशवानी यांनी आरोप केला आहे की, इम्रान खान यांचे न्यायालयातून “अपहरण’ करण्यात आले आहे. एका व्हिडिओ संदेशात पीटीआय नेते मसरत चीमा यांनी तर इम्रान खान यांची हत्या केली जाईल, अशी भीती व्यक्त केली आहे.
इस्लामाबाद पोलिसांनी सांगितले की, इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या अटकेबाबत निवेदन जारी करताना राष्ट्रीय उत्तरदायित्व संस्था (एनएबी)ने म्हटले आहे की, एनएबी अध्यादेश आणि कायद्यानुसार त्यांना अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांना अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टमध्ये आर्थिक गैरप्रकार केल्याबद्दल कारवाई केली आहे. खान यांना नोटीस दिली होती. त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. “एनएबी’ पाकिस्तानमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करते. पाकिस्तानच्या मीडिया रिपोर्टसनुसार, इम्रान खान यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना “एनएबी’ कार्यालयात पाठवण्यात आले आहे. इस्लामाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 144 लागू असून परिस्थिती सामान्य आहे. इम्रान खान अन्य एका प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात हजर झाले होते; मात्र त्यांना दुसऱ्याच प्रकरणात अटक करण्यात आली.
इम्रान खान न्यायालयात पोहोचण्यापूर्वीच “एनएबी’ टीम तेथे हजर होती. इम्रान खान यांना ताब्यात घेतल्यानंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अमीर फारूक यांनी पाकिस्तानचे अंतर्गत सचिव, आयजी इस्लामाबाद आणि अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणाले की, या घटनेनंतर जी तोडफोड करण्यात आली आहे, त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. न्यायालयातील सुरक्षा व्यवस्था रेंजर्सनी ताब्यात घेतली आहे.
इम्रान खान यांनी 26 डिसेंबर 2019 रोजी अल कादिर विद्यापीठ प्रकल्पासाठी अल कादिर ट्रस्टची नोंदणी केली होती. या ट्रस्टचे दोनच विश्वस्त आहेत. एक इम्रान खान आणि दुसरी त्यांची पत्नी बुशरा बीबी.
गेल्या वर्षी जूनमध्ये, पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (पीडीएम) सत्तेवर आल्यानंतर, माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्यावर आरोप लावण्यात आले की, त्यांनी एका रिअल इस्टेट कंपनीकडून 50 अब्ज रुपयांची लॉंडरिंग केली होती. त्यांच्या ट्रस्टला देणगी म्हणून कोट्यवधी रुपयांची जमीन मिळाली. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी आरोप केला होता, की इम्रान यांच्या कार्यकाळात ब्रिटनच्या “नॅशनल क्राइम एजन्सी’ने मनी लॉंडरिंगच्या चौकशीनंतर प्रॉपर्टी व्यवसायातील बडी असामी मलिक रियाझचे पैसे परत केले होते. इम्रान खान यांनी 3 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर ही रक्कम ब्रिटनमधील रियाज मलिक यास परत करण्यासाठी मंजूर केली. खान आणि त्यांच्या पत्नीला त्यांची अनेक बेकायदेशीर प्रकरणे “कव्हर’ करण्यासाठी प्रॉपर्टी टायकूनने अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्टची जमीन दिली होती, असा आरोपही सरकारकडून करण्यात आला होता.
“अल कादिर युनिव्हर्सिटी ट्रस्ट’च्या नावे शेकडो एकर जमीन प्रॉपर्टी टायकूनकडून घेतल्याप्रकरणी चौकशीचे रूपांतर तपासात करण्यात आले. “नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो'(एनएबी) यापूर्वी सत्तेचा कथित दुरुपयोग आणि ब्रिटनमधून मिळालेल्या गुन्ह्याचे “उत्पन्न’ वसूल केल्याच्या आरोपांची चौकशी करत होते. “एनएबी’ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा प्रकरण तपासाच्या टप्प्यावर पोहोचते, तेव्हा आरोपींची चौकशी केली जाते आणि गरज पडल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते. दुसरीकडे, इम्रान खान यांचे वकील बॅरिस्टर गौहर यांनी सांगितले की,
अल कादिर ट्रस्ट प्रकरणातील चौकशीचे रूपांतर तपासात झाल्याचे कळताच त्यांनी मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. या अर्जात इम्रान खान यांना अटक करण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. इम्रान खान यांच्यावर इतरही अनेक खटले सुरू आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पुढील पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. इम्रान खान यांनी सत्तेत असताना तोशाखान्यातून मिळालेल्या भेटवस्तूंबाबत अधिकाऱ्यांना योग्य माहिती दिली नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले होते. इम्रान खान यांनी आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
पंतप्रधानपद भूषवताना स्वत:च्या फायद्यासाठी महागड्या भेटवस्तू विकल्याचा आरोप इम्रान खान यांच्यावर आहे. इम्रान खान यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या जाहीरनाम्यात आपल्या मालमत्तेचा तपशील दिलेला नाही. निवडणूक आयोगाने नंतर जिल्हा न्यायालयात तक्रार दाखल केली की, इम्रान खान यांनी पंतप्रधान असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तू विकल्या. या प्रकरणात त्यांना फौजदारी कायद्याद्वारे शिक्षा व्हायला हवी. पाकिस्तानमध्ये 1974 मध्ये तोशाखान्याची स्थापना करण्यात आली होती. हा मंत्रिमंडळाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील एक विभाग आहे, जेथे देशाचे प्रमुख, मंत्री, नोकरशहा, संसद सदस्य किंवा विदेशी सरकारकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तू ठेवल्या जातात. कोणत्याही परदेश दौऱ्याच्या वेळी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी या भेटवस्तूंची नोंद ठेवतात आणि मायदेशी परतल्यावर त्या तोशाखान्यात जमा केल्या जातात. तोशाखान्यात ठेवलेल्या वस्तू स्मरणिका म्हणून पाहिल्या जातात. कॅबिनेटच्या मंजुरीनंतरच येथे ठेवलेल्या वस्तूंची विक्री करता येते.
मिळालेल्या भेटवस्तूची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर ती व्यक्ती आपल्याजवळ विनामूल्य ठेवू शकते. भेटवस्तूची किंमत 30 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास, त्या किमतीच्या 50 टक्के रक्कम जमा करून ती खरेदी करता येते. 2020 पूर्वी, वस्तूंच्या वास्तविक किमतीच्या केवळ 20 टक्के रक्कम जमा करावी लागत होती. या भेटवस्तूंमध्ये सामान्यत: महागडी घड्याळे, सोन्याचे आणि हिऱ्यांचे दागिने, महागडे दागिने, स्मृतिचिन्हे, रत्नजडीत पेन, क्रॉकरी आणि कार्पेट्स यांचा समावेश होतो. इम्रान खान विरोधात एका महिला न्यायाधीशाचा अपमान केल्याचाही गुन्हा आहे. ऑगस्ट 2022 मध्ये इम्रान खान यांचा जवळचा सहकारी शाहबाजला देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
एका राजकीय सभेत इम्रान खान यांनी इस्लामाबादचे पोलीसप्रमुख आणि एका महिला न्यायाधीशांचा आणि त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्याशी गैरवर्तन केल्याबद्दल निषेध केला. आपल्या भाषणात, इम्रान खान यांनी आपला मित्र शाहबाज गिल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी, एक महिला दंडाधिकारी, निवडणूक आयोग आणि राजकीय विरोधकांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. इम्रान खान यांनी विशेषत: अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश झेबा चौधरी यांना लक्ष्य केले. इम्रान खान यांनी सरकारी अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी दहशतवादविरोधी कायदे मोडले आहेत. अशा अनेक प्रकरणात आता त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल असून त्यांचा तपास सुरू आहे.आता त्यांना अटक केल्यानंतर त्यांनी त्याचा वापर निवडणुकीसाठी भांडवल म्हणून सुरू केला आहे. खान यांच्या अटकेचे परिणाम अन् सरकार कसा सामना करते हे पाहणे महत्त्वाचे राहील.