– नंदिनी आत्मसिद्ध
“गूगल फॉर इंडिया’द्वारे भारताच्या डिजिटल भविष्याच्या विकासासाठी गूगल ही कंपनी प्रयत्न करत आहे. त्याबाबत…
सध्याच्या अत्यंत आव्हानात्मक अशा बाह्य वातावरणात व्यवसायवृद्धीबाबत सावध दृष्टिकोन असला, तरी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस किंवा टीसीएसने चालू वर्षात कॅम्पस भरतीच्या माध्यमातून 40 हजार नवपदवीधरांना सेवेत सामावून घेण्याची योजना आखली आहे, ही आनंदाचीच बातमी आहे. सध्या नवीन वर्कऑर्डर्स किंवा कार्यादेश आणि मागणी जगभरच मंदावली आहे. देशाच्या आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांनी नवीन नोकरभरतीच्या योजनांबाबत नकारात्मक भूमिका घेतली आहे. परंतु टीसीएसने मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली जाणार नाही, उलट नवीन भरती केली जाईल, असे जाहीर करून तरुण पिढीस दिलासाच दिला आहे.
टीसीएससह इन्फोसिस आणि एससीएल टेक या तीन कंपन्यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून, त्यांच्या मनुष्यबळात सरलेल्या तिमाहीत सुमारे 16 हजार इतकी कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. त्यात इन्फोसिसने तर यंदा नवीन भरतीसाठी कॅम्पस प्लेसमेंटचा मार्ग अनुसरला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी इन्फोसिसने 50 हजार नवपदवीधरांना सेवेत सामावून घेतले होते. तथापि, कर्मचारी गळतीचे प्रमाण वाढले असतानाही, नवनवीन प्रतिभा आणि गुणवत्तेला वाव द्यावाच लागेल, असे टीसीएसचे मुख्य परिचलन अधिकारी एन. गणपती सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
मागील 12 ते 14 महिन्यांत कंपनीने अभूतपूर्व कर्मचारी गळती अनुभवली. टीसीएसच्या सहा लाखांच्या कर्मचारीबळापैकी दहा टक्के म्हणजे 60 हजार कर्मचारी हे नेहमी अतिरिक्त स्वरूपात असतात. जेव्हा गरज पडेल, तेव्हा उत्पादक कार्यासाठी योग्य ते प्रशिक्षण आणि कौशल्यवर्धनासह हे अतिरिक्त मनुष्यबळ वापरात आणले जाते. आगामी काळात मागणी वाढत असल्याचे दिसल्यास, त्यासाठी हे नियोजन कामी येईल, असेही सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे. यामुळे नवनवीन कुशल पदवीधरांना नोकऱ्या मिळू शकतील, असे वाटते. गेल्या वर्षी भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत संधू यांनी गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे “पद्मभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. भारत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि माझ्या मायभूमीला मी विसरू शकत नाही, अशी सार्थ भावना तेव्हा पिचाई यांनी व्यक्त केली.
भारताच्या डिजिटल इंडियाच्या धोरणाबद्दल त्यांचे अत्यंत चांगले मत आहे. जगातील लोकप्रिय सर्च इंजिन असलेले गूगल 100 हून अधिक भारतीय भाषांमध्ये मजकूर आणि व्हॉइस इंटरनेट सर्च उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती गेल्या वर्षी त्यांनी दिली होती. भारतातील तांत्रिक बदलांची गती विलक्षण असून, गूगल लहान व्यवसाय आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहे. त्याचबरोबर सायबर सुरक्षेसाठी गुंतवणूक करत असून, त्या क्षेत्रातील शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी प्रयत्न करत आहे. कृषी आणि आरोग्य सेवांसारख्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान लागू करत आहे. “गूगल फॉर इंडिया’द्वारे भारताच्या डिजिटल भविष्याच्या विकासासाठी ही कंपनी प्रयत्न करत आहे. त्यामध्ये विविध भारतीय भाषांचा मजकूर आणि उच्चार समजू शकेल, अशी कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केली जात आहे.
याचा भारतासह जगभरातील अब्जावधी लोकांना फायदा होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पिचाईंशी डिजिटल माध्यमातून चर्चा केली. नवी दिल्ली येथे डिसेंबरमध्ये भारताकडून “एआय समिट’ आयोजित केले जात असून, त्यामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण त्यांनी दिले. पिचाईंच्या सहभागाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ भारतीय तरुणांना निश्चितच होईल. सरकारी कारभार सुधारण्यासाठी, म्हणजेच सुशासनासाठी एआय सोल्यूशनवर काम करण्यासाठी गूगलने सहकार्य करावे, असे पंतप्रधानांनी त्यांना रास्तपणे आवाहनही केले. सुंदर पिचाई यांनी 2022 मध्ये सुमारे 19 अब्ज रुपये कमावले आहेत. स्टॉक वॉर्डस रूपाने त्यांना यातील बहुतेक भाग मिळाला. गूगलमध्ये काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या उत्पादनापेक्षा हे उत्पन्न 800 पट जास्त आहे!
गेल्या जानेवारीमध्ये गूगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, ही पार्श्वभूमीही आपल्याला माहिती असायला हवी… पिचाई यांना अनेक उत्पादनांचे यशस्वी लॉंचिंग केल्याबद्दल आणि सीईओ पदावर बढती मिळाल्यानंतरही मोठी रक्कम पगार म्हणून देण्यात आली आहे. पिचाई यांच्या नेतृत्वाखाली गूगलने त्यांच्या प्रमुख जाहिराती आणि यूट्यूब व्यवसायातून नफा कमावला. कंपनीने मशीन लर्निंग, हार्डवेअर आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्येही गुंतवणूक केली आहे. पिचाई यांनी खरगपूर आयआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर अधिक शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. मोदी यांनी पिचाईंशी भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन इकोसिस्टीम उभारण्यासंबंधात चर्चा केली. गूगल आणि हेवलेट पॅकर्ड किंवा एचपी हे भागीदारीतून क्रोमबुक लॅपटॉपचे भारतात उत्पादन करणार आहेत. भारताच्या दृष्टीने हे खूप फायद्याचे आहे.
कारण क्रोमबुकचे भारतात उत्पादन झाले, तर त्यामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला एक चैतन्य मिळेल. युक्रेन युद्ध तसेच इस्रायल आणि पॅलेस्टाइन युद्ध यामुळे जगात अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या पुरवठा साखळीमध्ये बदल करून, वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करत आहेत. आपल्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भारताची निवड करणाऱ्यांमध्ये गूगलसारख्या अव्वल कंपनीची भर पडणे, हे लक्षणीय मानावे लागेल. भारतात उत्पादन आणि व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आहे, अशी प्रतिमा त्यामुळे अधिक ठळक होऊ शकेल. क्रोमबुक हे गूगलच्या क्रोम ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारे लॅपटॉप आहेत. चेन्नईमध्ये असलेल्या फ्लेक्स फॅसिलिटीमध्ये सध्या क्रोमबुक लॅपटॉप तयार केले जात आहेत. तेथे गेल्या तीन वर्षांपासून एचपी कंपनी त्यांचे लॅपटॉप आणि डेस्कटॉप्सची निर्मिती करत आहे.
फ्लेक्स फॅसिलिटीमध्ये 2 ऑक्टोबरपासून गूगल क्रोमबुकचे उत्पादन सुरू झाले असून, मागणीनुसार पुरवठा करण्याचे धोरण स्वीकारले गेले आहे. मुख्यतः भारतातील शैक्षणिक क्षेत्र आणि परवडणाऱ्या दरात संगणक उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. क्रोमबुकचे भारतातील निर्माते हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये प्रस्थापित असलेल्या डेल, लेनोवा व आसूस या कंपन्यांशी स्पर्धा करण्याच्या दृष्टीने गूगलला मदत करणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनाचे हब म्हणून चीनची ख्याती आहे; परंतु आता अनेक कंपन्या, खासकरून अमेरिकेतील कंपन्या या चीनला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत.
भारतात लॅपटॉप संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मागणी वाढल्यामुळे, या वस्तू आयात कराव्या लागत आहेत. आपल्या आयातीत चीनचाच वाटा 70 ते 80 टक्के असून, ही आयात कमी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. जागतिक पुरवठा साखळीत भारत स्वतःला विश्वसनीय भागीदार म्हणून प्रस्थापित करण्याच्या धडपडीत आहे. भारत सरकारची उत्पादनसंलग्न प्रोत्साहन योजना किंवा पीएलआय ही ऑगस्टमध्ये बंद करण्यात आल्यामुळे डेल, एचपी, लेनोवो यासह 40 हून अधिक कंपन्यांनी भारतात लॅपटॉप, संगणक व सर्व्हरचे उत्पादन करण्यासाठी अर्ज केला आहे. सरकार लवकरच सुमारे 30 कंपन्यांचे अर्ज मंजूर करेल, अशी अपेक्षा आहे. या सगळ्याचा आत्मनिर्भर भारतासाठी उपयोगच होणार आहे.