पेठ, (वार्ताहर) – सध्या उन्हाळा तीव्र वाढलेला आहे. उन्हाळ्याच्या झळा माणसाप्रमाणेच पाळीव प्राण्यांना सुद्धा बसत आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी आपल्या पशुधनाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये हवेशीर ठिकाणी कडब्याच्या पेंड्यापासून मांडव बनवतात. पण सातगाव पठार भागामधून पेठ येथील एका शेतकऱ्याने बैल आणि बैलगाड्यांसाठी असलेल्या मांडवाला दिल्लीच्या लाल किल्ल्याचे रुप दिले आहे.
ज्वारीचा कडबा आणि बांबूपासून गड किल्ल्यांची प्रतिकृती बनविण्याचा छंद या सातगाव पठार परिसरातील पेठच्या पवळे कुटुंबीयांना साधारण १० वर्षांपासून जडला आहे. पेठचे एक शेतकरी,प्रसिद्ध गाडामालक दिलीप पवळे व कुटुंबीय गेली अनेक वर्षे ढोरांच्या मांडवांना वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचा आकार देत असतात.
याही वर्षी बैलगाड्यासाठी असलेल्या बैलांसाठी दिल्लीच्या लाल किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सातगाव पठार आणि तालुक्यातून कौतुक होत आहे. महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव बैलांचा मांडव की जो ज्वारी कडबा आणि बांबूपासून साकारलेला गड,किल्ल्याची प्रतिकृती आहे.
असा तया होतो मांडव…
इतिहासाचा वारसा जपणारा छत्रपतींचा मावळा,स्वकष्टाने ज्वारीच्या कडब्यापासून बैलांसाठी मांडव प्रसिद्ध बैलगाडा मालक दिलीप पवळे आणि मुलगा शिवाजी पवळे आणि इतर कुटुंबीयांनी तयार केला. मित्रमंडळी दरवर्षी वेगवेगळी प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना मदत करत असतात. ज्वारी कडबा आणि वेळुचे बांबूपासून शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांची प्रतिकृतीचा आकार देण्याचा प्रयत्न केला असून वडाच्या पारंब्या बांधणीसाठी वापरण्यात आल्या आहेत.
साधारण दोन महिने बांधण्यासाठी वेळ लागला. मांडवाची लांबी ४२ फूट, रुंदी २७ फूट व उंची २४ फूट असून ६०० ज्वारी कडबा पेंढ्या व २५० हून अधिक बांबूपासून मांडव बनवला आहे. विजेचे पंखे मांडवामध्ये लावण्यात आले आहेत. आतापर्यंत शिवनेरी,तोरणा, राजगड, रायगड मेघडंबरी, शनिवार वाडा, काल्पनिक महाल, असे विविध प्रकार बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पवळे कुटुंबीयांचा हा छंद पाहण्यासाठी लोक आवर्जून सदिच्छा भेट देतात.
वृषभ राजासाठी मांडव
अनेक वर्षांपासून ज्वारीच्या कडब्यापासून पवळे कुटुंबीय हा शर्यतीच्या बैलांसाठी सावली म्हणून मांडव उभारतात. आपल्या शेतीतून मौल्यवान अन्नधान्य बनविण्यासाठी मदत करणाऱ्या वृषभराजासाठी दरवर्षी असा मांडव तयार करण्यासाठी ते शेतामध्ये स्वतंत्र ज्वारी पेरतात.
ज्वारी पेरताना ती दाट होणार नाही याची काळजी घेतात जेणेकरून ज्वारीचे ताट मजबूत व जाड मिळते, या मांडवाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण मांडव वडाच्या पारंब्यापासून बांधलेला आहे. मांडव बांधण्यासाठी कोठेही सुतळी किंवा तार वापरलेली नाही, इतिहासाचा वारसा जपताना पवळे कुटुंबीयांनी या बांधणीतील पारंपरिकता आवर्जून जपली आहे.
मोठ्या कष्टाने हा बैलांचा मांडव उभारत दिलीप पवळे यांनी बैलगाडा संस्कृती, परंपरा यासोबतच गोसंवर्धनाचा चांगला संदेश पुढील पिढीस दिला आहे. नाशिक-पुणे हायवेवर राजगुरुनगर ते मंचर या दरम्यान पेठ गावात हायवेलगत हा मांडव उभा आहे. येथून जाताना आवर्जून अनेक जण भेट देतात व मांडव पाहून अनेक पर्यटक आणि बैलगाडा शौकीन पवळे कुटुंबीय यांचे कौतुक करतात.