- देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका : भाजपचा कार्यकर्ता मेळावा
पिंपरी – राज्यातील आघाडीचे सरकार रोज घोषणा करते आणि त्या घोषणेवरून मागे फिरते. त्यामुळे या सरकारला पलटूराम सरकार म्हटले पाहिजे, अशी घणाघाती टीका राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केली.
चिंचवडगाव येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात बुधवारी (दि. 25) पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यातील अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. काल-परवापर्यंत 50 हजार रुपये हेक्टरी मागणारे आणि देऊ म्हणणारे आज एका नव्या पैशाची मदत कोणाला करीत नाहीत. त्यामुळे या सरकारचे नाव पलटूराम सरकार म्हटले पाहिजे. कारण ते दररोज आश्वासन देतात आणि आपल्या आश्वासनांवर टिकून राहत नाहीत.
एकच धंदा बदल्या करा, माल कमवा
फडणवीस पुढे म्हणाले, या सरकारचा एकच धंदा सुरू आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणात बदल्या करा आणि माल कमवा. बदल्या करण्यासाठी एकाका अधिकाऱ्याला चार-चार जण फोन करतात की आम्ही तुमची बदली करून देतो, आमच तेवढ पक्क करा. दुसरा म्हणतो मी त्याहीपेक्षा चांगल्या ठिकाणी बदली करतो, तुम्ही माझ्याशी पक्क करा. अशा प्रकारची अवस्था यापूर्वी महाराष्ट्राने कधीही पाहिलेली नव्हती.
फडणवीस म्हणाले, करोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने एक नव्या पैशाचीही मदत कोणालाही केली नाही. देशातील छोट्या छोट्या राज्यांनीही पॅकेज तयार करून गोरगरीबांना मदत केली. मात्र देशात समृद्ध राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील सरकारने एका फुटक्या कवडीचीही मदत कोणाला केली नाही. केवळ तुम्ही तुमच्या घरी रहा आणि तुमचे कुटुंब सांभाळा, आम्ही आमचे कुटुंब सांभाळतो, याच्या व्यतिरिक्त कोणतेही काम झालेले नाही.
वीजेच्या वाढील बिलांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, न वापरलेल्या वीजेची भरमसाठ वीजबिले लोकांना आली. याबाबत आंदोलन केल्यावर आम्ही बिले सुधारून देऊ आणि बिलामध्ये सवलतही देऊ, असे आश्वासन सरकारने सांगितले. त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीनंतर तीन मंत्री बाहेर आले. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. निर्णय झालाय, वीज बिलात सवलत देणार असल्याचे जाहीर करीत प्रसिद्धी घेतली. मात्र गेल्या आठवड्यात राज्याचे उर्जामंत्री म्हणाले, कोणाला एक पैशाचीही सवलत मिळणार नाही. वीज वापरली आहे तर पैसे भरावेच लागतील.
तीनशे कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपाबाबत मौन
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या वतीने विकासकामांसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियत तब्बल 300 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. माजी मुख्यमंत्री यांच्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होऊनही माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात याबाबत काही खुलासा केला नाही. तसेच पत्रकारांनी याबाबत विचारले असता पुण्याच्या पत्रकार परिषदेत बोलू, असे म्हणून त्यांनी विषय टाळला.
या दोघानांही मुख्यमंत्री करा
उमेदवाराचा परिचय देण्यासाठी आलेले भाजपचे स्थानिक पदाधिकारी राजू दुर्गे यांनी भाजपची सत्ता आल्यावर शहरातील दोन्ही आमदारांपैकी एका कॅबिनेट तर दुसऱ्याला राज्यमंत्री करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यावर काही कार्यकर्त्यांनी दोघांनाही कॅबिनेट करा, असे पाठीमागून सांगितले. यामुळे गडबडलेल्या दुर्गे यांनी हो हो म्हणत दोघांनाही मुख्यमंत्री करा, अशी मागणी केली. यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. मात्र लगेच आपली चूक सावरून नेत दोन्ही आमदारांना कॅबिनेट करा आणि आम्हालाही एखाद्या महामंडळावर सदस्य म्हणून घ्या, अशी मागणी पुढे रेटल्याने पुन्हा हशा पिकला.
नाहीतरअख्ख मंत्रीमंडळ इथेत ठरल असत
त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेले माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यामध्ये भर घातली. बर झालं दुर्गे यांनी आपल भाषण थांबवल. नाहीतर अख्ख मंत्रीमंडळ इथेत ठरल असत, असे म्हणताच पुन्हा एकदा सभागृहात हशा पिकला.