पुणे – पुणे पदवीधर निवडणुकीत बोगस मतदार नोंदणी झाल्याचे बोलून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वत:चा पराभव मान्य केला आहे. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित आहे, असा विश्वास असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
विरोधकांना स्वत:चा पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी आतापासूनच “कव्हर फायरिंग’ सुरू केली आहे. पदवीधर निवडणुकीत ईव्हीएम मशीन नसते, त्यामुळे पराभव झाल्यानंतर दोष कोणाला द्यायचा. त्यामुळे पाटील यांनी आतापासून बोगस मतदानाचा मुद्दा धरून ठेवला आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आघाडीचे सरकार कधी पडेल याकडे आमचा डोळा लागलेला नाही. मात्र, हे अनैसर्गिक सरकार असून, असा प्रकारचे सरकार चार ते पाच वर्षे टिकल्याचा इतिहास नाही. त्यामुळे तुम्हाला जेवढे जमतंय तेवढे सरकार चालवा. ज्यावेळी हे सरकार पडेल, त्यावेळी आम्ही पर्यायी सरकार देऊ हे नक्की, असे फडणवीस यांनी सांगितले.
करोनामध्ये भाजप राजकारण करत असल्याची तक्रार सरकारने पंतप्रधानांकडे केली. याबाबत बोलताना फडणवीस यांनी “आनंद आहे. आम्ही एवढी पत्र पाठविली, सूचना केल्या. त्यातील एकाही पत्राला उत्तर दिले नाही. बैठक बोलवल्या नाहीत.
सरकार निर्णय घेणार नसेल, मनमानी करणार असेल आणि भ्रष्टाचार करत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांविषयी बोलताना “त्यांचे नेमकं दुखणं काय आहे, हे मला माहिती आहे.’ त्यावर मी काही बोलणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.