इस्लामाबाद: भारताशी चीनने नाहक पंगा घेतल्याने पाकिस्तानची तंतरली आहे. त्यातून पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने पंतप्रधान इम्रान खान यांना चीनशी फार जवळीक न करण्याचा सल्ला दिला आहे.
भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यासाठी चिनी कुरापती कारणीभूत आहेत. करोना संकटामुळे आधीपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनविषयी संतापाची भावना आहे. अशातच भारताशी पंगा घेतल्याने चीनविषयीची नाराजी आणखी वाढली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन एकाकी पडण्याची शक्यता बळावली आहे.
अशात चीनला समर्थन देण्याचे धोरण सुरूच ठेवले तर पाकिस्तानही एकाकी पडण्याचा धोका आहे, असा इशारा परराष्ट्र विभागाने इम्रान यांना दिल्याचे समजते. भारताबरोबर निर्माण झालेल्या तणावानंतर चीनने सीमेजवळील सैन्य वाढवले आहे.
चीनशी संगनमत करून पाकिस्ताननेही सीमेवर अतिरिक्त सैनिक पाठवल्याचे वृत्त आहे. त्या पार्श्वभूमीवर, चीनबाबतच्या धोरणाचा फेरआढावा घेण्याचा कळकळीचा सल्ला पाकिस्तानी परराष्ट्र विभागाने इम्रान यांना दिल्याचे समजते.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताबरोबरच गिलगिट-बाल्टिस्तान भागांतील स्थानिकांमध्येही चीनविषयी प्रचंड नाराजी आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अंतर्गत त्या भागांमध्ये विविध कामे सुरू आहेत.
मात्र, त्या कामांमध्ये स्थानिकांना डावलून चीनमधील कामगारांना प्राधान्य दिले जात आहे. त्यातून स्थानिकांच्या संतापाचा उद्रेक होणे पाकिस्तानला परवडणारे नाही.