नवी दिल्ली – बायोबबलमध्ये करोनाचा शिरकाव कसा झाला हे आम्हाला ठाऊक नाही. पण बबलच्या नियमांचे कोणीही उल्लंघन केले नाही. आपल्या देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. इतक्या लोकांना करोनाचा संसर्ग कसा होत आहे, हे सांगणे जसे अवघड आहे. तसेच बबलमध्ये करोनाचा शिरकाव कसा झाला हे सांगणे कठीण आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे.
सौरव गांगुलीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आयपीएल 14च्या आयोजनाबाबतच्या
अनेक गोष्टींचा खुलासा केला. तसेच भारतामध्ये आयोजन करण्यात काही चूक नव्हती, असा दावा बीसीसीआयने केला आहे. सौरव गांगुली म्हणाला, करोना महामारीच्या काळात आयपीएलचे देशात आयोजन करणे हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. बीसीसीआयने 14व्या मोसमासाठी 6 शहरांची निवड केली होती. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आयपीएल स्पर्धा स्थगित झाल्याने नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले.
आम्ही भारतामध्ये आयपीएल स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला तेव्हा परिस्थिती इतकी खराब नव्हती. करोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी झाली होती. आम्ही इंग्लंड दौऱ्याचेही यशस्वी आयोजन केले. या आयपीएलचे यूएईमध्ये आयोजन करण्याबाबतही चर्चा झाली होती. पण, फेब्रुवारी महिन्यात देशात कोविडच्या केसेस खूप कमी होत्या, याकडे गांगुलीने लक्ष वेधले.
गेल्या तीन आठवड्यांत देशात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यापूर्वी असे काही नव्हते. आम्ही यूएईबाबतही विचार केला. त्यानंतर आयपीएल 2021चे आयोजन भारतामध्ये करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धा स्थगित झाली असून रद्द झालेली नाही, असे गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले होते; परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकात यंदा आयपीएल पुन्हा आयोजित करण्यासाठी वेळ मिळेल हे सांगणे अवघड असल्याचे गांगुली म्हणाला.