अमरधाममध्ये आजपासून दुसरी विद्युत दाहिनी सुरू
नगर (प्रतिनिधी) – करोनामुळे मागील तीन महिन्यापासून शहरासह जिल्ह्यात मृत्युचे प्रमाण वाढले आहे. शहराबरोबरच जिल्ह्यातील व तालुक्यातील रुग्ण शहरातील हॉस्पिटलमध्ये उपचाराकरीता येतात. काही रुग्णांवर उपचार सुरु असतानांच अचानकपणे निधन होते. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार कोविड बाधित रुग्ण ज्या ठिकाणी मयत होतात त्याठिकांनीच अंत्यविधी केला जातो. तसेच नालेगाव येथील अमरधाम येथे एकच विद्युत दाहिनी आहे. त्यामुळे तेथे अंत्यविधीचे प्रमाण जास्त असल्याने या विद्युत दाहिनीवर तान येत असल्याने त्यात बिघाड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून दुसरी विद्युत दाहिनी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अमरधामबाबत कोणीही राजकारण करू नये असे, महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.
लेगाव अमरधाममध्ये करोनाबाधित मयत रुग्णावर अंत्यसंस्कार रिकाम्या जागेवर झालेल्या प्रकाराबाबत महापौर वाकळे यांनी तातडीने बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, आरोग्यधिकारी अनिल बोरगे, अजय चितळे, वैभव वाघ, गजेंद्र दांगट, राजू वामन, राम वाघ, अमरधामचे व्यवस्थापक स्वप्निल कुऱ्हे आदी उपस्थित होते.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत आहे. यामुळे रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण ही वाढले आहे. नालेगांव अमरधाम क्षेत्रफळ पाहता ते अपुरे पडत आहे. तसेच नालेगांव अमरधाम येथे संपूर्ण जिल्ह्यातील अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या भितीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे, नालेगांव अमरधाम येथे नगर शहरातील अंत्यविधी करण्यात यावी अन्यथा अंत्यविधी बंद करण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा परिसरातील नागरिकांसमवेत अमरधाम येथे गेटबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नालेगाव ग्रामस्थांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर महापौर यांनी आज दुसरी विद्युत दाहिनी बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
नालेगाव येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, अंत्यविधी मोठ्याप्रमाणात होत असल्याने धुराचे लोट नालेगांव गावठाण, सुडके मळा, बागरोजा हाडको, दिल्लीगेट, पटवर्धन चौक, कल्याण रोड परिसर, ठाणगे मळा इत्यादी परिसरात पसरत आहे. या सध्याच्या वातावरण व करोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता या सर्व परिसरातील नागरिकांच्या मनात भितीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मनपाने दुसरी विद्युत दाहिनी बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मृतांची हेळसांड होणार नाही असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.