किबिथू (अरुणाचल प्रदेश) – कोणी डोळे मोठे करूनही आमच्या भूमीकडे पाहू शकत नाही. आपल्या सैनिकांच्या शौर्याने आपल्या सीमा सुरक्षित आहेत. अशा स्थितीत आपल्या हद्दीत अतिक्रमणाचा प्रश्नच उद्भवत नाही. सुईच्या टोकावर मावेल इतकीही जमीन कोणीही घेऊ शकत नाही, असे स्पष्त प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यांनी किबिथू येथे ‘व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ आणि विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ केला. यावेळी आपल्या भाषणात त्यांनी चीनला चोख प्रत्युत्तर दिले. खरे तर आजच अमित शाह यांच्या दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता.
अरुणाचल प्रदेशातील किबिथू येथे अमित शाह म्हणाले की, आमचे आयटीबीपीचे जवान आणि लष्कर आमच्या सीमेवर रात्रंदिवस काम करत असल्याने आज संपूर्ण देशातील नागरिक आज घरी शांतपणे झोपू शकतात. आज आपण अभिमानाने सांगू शकतो की आपल्यावर वाईट नजर टाकण्याची कोणाचीही ताकद नाही.
वर्ष 2014 पूर्वी संपूर्ण ईशान्य प्रदेश हा अशांत क्षेत्र म्हणून ओळखला जात होता, परंतु पंतप्रधान मोदींच्या गेल्या 9 वर्षांच्या ‘पूर्वेकडे पहा’ धोरणामुळे आता ईशान्य भाग हा एक असा प्रदेश म्हणून ओळखला जात आहे जो देशाच्या हितासाठी विकासाला हातभार लावत आहे.