प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 5 -पुणे प्रादेशिक परिवहन विभागाची (आरटीओ) इंटरनेट सेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा ही सेवा विस्कळीत झाल्याने शेकडो नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. किरकोळ कामकाजासाठीही दोन-दोन दिवस चकरा माराव्या लागत आहेत. हतबल नागरिक विचारणा करत असले, तरी त्यांना हुसकावले जात आहे.
पुणे आरटीओ येथे लर्निंग लायसन्स, कर्ज बोजा, लायसन्सचे नूतनीकरण, डुप्लिकेट लायसन्स, रिक्षाचे परमिट तसेच वाहन ट्रान्सफरची कामे ऑनलाइन सुरू असतात. यासाठा शेकडे नागरिक सकाळपासून गर्दी करत आहेत. मात्र, अचानकपणे इंटरनेट बंद पडल्याचे कारण देत नागरिकांना ताटकळत ठेवले जात असून, विचारणा करणाऱ्यांना “आज कामकाज सुरू होणार नाही. तुम्ही उद्याच या’ असे सांगत पिटाळून लावत आहेत. शुक्रवारीही येथे इंटरनेट बंद होते. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी “ही सेवा दहा मिनिटांपूर्वीच बंद पडली आहे,’ असे सांगण्याचा प्रयत्न केला. खातरजमा करण्यासाठी नागरिकांशी संवाद साधला असता “दोन ते तीन दिवसांपासून परवाना नूतनीकरणासाठी येत आहोत. पण, काम होत नाही,’ असे त्यांनी सांगितले.
कधी मेट्रो, कधी बीएसएनएल
या इंटरनेट बिघाडाचे खापर आरटीओ अधिकारी कधी मेट्रो, तर कधी बीएसएनएलच्या कारभारावर फोडत आहेत. परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने केबल तुटून इंटरनेट विस्कळीत झाल्याचे सांगण्यात येते. तर कधी बीएसएनएलच्या सेवेत समस्या असल्याचे सांगत त्यांना दोष देण्यात येत आहे. वारंवार तक्रारी वाढत असतानाही जुजबी सोय करून वेळ मारून नेली जात आहे.
आरटीओ परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने सातत्याने इंटरनेट बंद होत आहे. आम्ही याबाबत संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. तसेच पर्यायी व्यवस्थादेखील करण्यात
आली आहे.
– अजित शिंदे, आरटीओ, पुणे
मोबाइल इंटरनेट अन् रांगा…
आरटीओची तातडीची कामे करण्यासाठी अधिकारीच कर्मचाऱ्यांना मोबाइल इंटरनेट वापरण्याच्या सूचना देत आहेत. तर, मर्जीतील लोकांचीच कामे मार्गी लावली जात आहेत. कर्मचारी लॅपटॉपच्या सहाय्याने इतर किरकोळ काम करत आहेत, पण ते कासवगतीने सुरू असल्याने नागरिकांना दोन ते तीन तास रांगेत उभे रहावे लागत आहे.