आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करणार
नवी दिल्ली – भारतीय फुटबॉल संघात नवोदित खेळाडू सरावले आहेत तसेच त्यांची कामगिरीदेखील सरस होत आहे. मात्र, असे असले तरीही इतक्यात निवृत्ती घेण्याचा कोणताही विचार माझ्या मनात नाही. मी सध्या खेळाचा पुरेपूर आनंद घेत आहे, असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने व्यक्त केले आहे.
वयाची पस्तीशी पार केली असली तरीही मी पूर्ण तंदुरुस्त आहे. सध्या करोनामुळे सांघिक सरावावर बंधने असली तरीही मी वैयक्तिक सराव करत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सर्व खेळाडूंप्रमाणे मलादेखील घराबाहेर पडता येत नव्हते. सरकारने पाचव्या लॉकडाऊनमध्ये दिलेल्या सवलतींमुळे देशातील मैदाने व क्रीडा संकुले खुली झाल्याने मला एकट्याने का होईना पण सराव करता येत असल्याने समाधान वाटत आहे, असे छेत्री म्हणाला.
उदांता व आशिक कुर्नियनसारखे नवोदित खेळाडू अव्वल कामगिरी करत आहेत. त्यांना आव्हान देण्याचा माझा विचार नाही; परंतु आजही मी संघासाठी किमान चार वर्षे खेळू शकतो व सातत्यपूर्ण कामगिरीही करू शकतो. कोणाला कमी लेखण्याचा माझा प्रयत्न नाही. मात्र, माझी क्षमता व मैदानावरील कामगिरी गेल्या तीन मोसमांमध्ये चांगली झालेली आहे. मग अशा स्थितीत निवृत्ती का घ्यायची. शरीर साथ देत आहे, कामगिरी सरस होत आहे, संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी होत आहे.
संघातील नवोदितांना मार्गदर्शन करता येते तर मग निवृत्तीचा विचार का करू, असा सवालही छेत्रीने विचारला आहे. 15 वर्षांपूर्वी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केल्यानंतर आज कारकिर्दीला नवे वळण देण्याची वेळ आली आहे. जगभरातील नावाजलेल्या फुटबॉलपटूंपेक्षाही जास्त सरस कामगिरी मला करता आली. इतकी वर्षे देशाचे प्रतिनिधित्वही करता आले यासाठी मी स्वतःला भाग्यशाली समजतो, असेही छेत्री म्हणाला.