बेंगळुरू – सरकारी कामाचे कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणात जो पोलिस तपास सुरू आहे त्यात सरकार हस्तक्षेप करीत असल्याच्या आरोपाचा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी इन्कार केला आहे. त्यांनी या प्रकरणात कॉंग्रेस अवाजवी आरोप करीत असल्याचाही दावा केला आहे.
या मुद्द्यावरून कॉंग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी मोठा आवाज उठवल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते के एस ईश्वरप्पा, यांनी शुक्रवारी रात्री ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. संतोष पाटील यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. संतोष पाटील यांनी आपल्या मृत्यूपुर्व चिठ्ठीत मंत्री ईश्वरप्पा यांनी आपल्याकडे सरकारी कंत्राटातील चाळीस टक्के कमिशन मागितले असल्याचा आरोप केला असून या आत्महत्येला सर्वस्वी ईश्वरप्पा यांनाच जबाबदार धरावे अशी मागणी त्यांनी या चिठ्ठीत केली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, संतोष पाटील यांच्या आत्महत्येची चौकशी सुरू आहे, पोस्टमॉर्टम झाले आहे, एफएसएल (फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी) अहवाल येईल. त्याआधारे काय झाले ते शास्त्रीयदृष्ट्या कळेल,परंतु, आम्ही तक्रारीनुसार एफआयआर दाखल केला आहे आणि त्यानुसार तपास सुरू आहे. तपासाच्या प्रगतीच्या आधारे, आणखी कलमे जोडली जाऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
कॉंग्रेसला कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी तपासनीस, फिर्यादी आणि न्यायाधीश व्हायचे आहे आणि ते तसे होऊ शकत नाही, असेही बोम्मई म्हणाले.