केंद्र सरकारच्या व्हिसाबंदीचा बीसीसीआयला फटका
नवी दिल्ली – करोनाच्या धोक्यामुळे केंद्र सरकारने परदेशी व्यक्तींना भारतात येण्यासाठी देण्यात येणारा व्हिसा बंद केल्यामुळे यंदा इंडियन प्रीमिअर लीगला (आयपीएल) फटका बसणार आहे. येत्या 15 एप्रिलपर्यंत ही व्हिसा बंदी सुरू राहणार असल्याने आयपीएलमध्ये करारबद्ध झालेल्या परदेशी खेळाडूंना पहिल्या काही सामन्यांत सहभागी होता येणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले आहे.
आयपीएलमधील सर्व संघांनी आपल्या संघात किमान 4 तर कमाल 6 परदेशी खेळाडू करारबद्ध केलेले आहेत, मात्र या खेळाडूंना येत्या 15 एप्रिलपर्यंत भारतातच येता येणार नाही. या स्पर्धेत सहभागी होणारे परदेशी खेळाडू व्यावसायिक व्हिसावर भारतात येतात, केंद्र सरकारने ही प्रक्रियाच संस्थगित केली आहे.
देशात करोनाचे अनेक रुग्ण असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे मद्रास उच्च न्यायालयात आयपीएल स्पर्धा रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. परदेशातील सरकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांना मात्र व्हिसा देण्यात येत असून त्याव्यतिरिक्त अन्य कोणालाही व्हिसा देण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारकडून अधोरेखित करण्यात आले आहे. यंदाच्या आयपीएलला येत्या 29 मार्चपासून प्रारंभ होणार आहे मात्र, ही संपूर्ण स्पर्धाच रद्द करावी अशी मागणी आता जोर धरत आहे.