नवी दिल्ली – आपल्या बदलीबाबत आपल्याला 17 फेब्रुवारीलाच माहिती देण्यात आली होती आणि आपली त्याबाबत काहीच तक्रार नव्हती, असे सांगून न्या. एस. मुरलीधर यांनी दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि वकील यांना पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या बदलीच्या घटनाक्रमाची माहिती दिली.
दिल्ली उच्च न्यायालयातील आपल्या निरोप समारंभात न्यायमूर्ती मुरलीधर बोलत होते. यावेळी न्यायाधीश मुरलीधर यांची आई, पत्नी उषा रामनाथन, दिल्ली हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश ए. पी. शाह, ज्येष्ठ वकील शांती भूषण आणि दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरू उपेंद्र बाक्सी हे देखील उपस्थित होते.
न्या. मुरलीधर म्हणाले, आपली पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्याबाबत न्यायमंडळाने केलेल्या शिफारशीवरून सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे पत्र 17 फेब्रुवारीला मिळाले होते. मी हे पत्र स्वीकारले. माझी दिल्ली उच्च न्यायालयातून बदली करायचीच असेल, तर पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात जाण्यात मला काहीच अडचण नसल्याचे उत्तर मी दिले, असे त्यांनी सांगितले.
कथित द्वेषपूर्ण भाषणांसाठी भाजपच्या तीन नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात अपयशी ठरल्याबद्दल न्या. मुरलीधर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले, त्याच दिवशी म्हणजे 26 फेब्रुवारीच्या रात्री केंद्र सरकारने न्या. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी केल्यामुळे वादाला तोंड फुटले होते.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयातून पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात झालेल्या बदली झाल्याच्या वादाबाबत न्या. एस. मुरलीधर यांनी माहिती दिल्याने यावरील वादावर आता पडदा पडला आहे.