नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणातील जमीनीबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याला आव्हान द्यायचे नाही असा निर्णय सुन्नी वक्फ बोर्डाने घेतला आहे.
आज झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला आव्हान द्यायचे नाही असे आम्ही ठरवले असले तरी या निर्णयाला सहमती दर्शवायची की नाही याविषयी आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही असे बोर्डाचे अध्यक्ष जफर फारूकी यांनी म्हटले आहे.
आजच्या बैठकीत आम्ही या निकालाचा अभ्यास केला. त्यावर फेरआढावा याचिका दाखल न करण्याचा निर्णय घेतला आहे असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
आजच्या बैठकीला बोर्डाच्या एकूण आठ सदस्यांपैकी सात सदस्य उपस्थित होते. सुन्नी वक्फ बोर्डाच्या या निर्णयाचे भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन यांनी स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की सुन्नी बोर्डाचा हा निर्णय देश हिताचा आहे त्यातून राष्ट्रीय सलोखा कायम राखला जाणार असल्याने आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो.