मुंबई – इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही. अशा प्रकारची माहिती पूर्णपणे चुकीची आहे, असे स्पष्टीकरण राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी दिले. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेणे आम्हाला भाग आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तामिळनाडू सरकारने दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय महाराष्ट्रात घेतला जाऊ शकतो, असे संकेत गायकवाड यांनी दिल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. परंतु गायकवाड यांनी ते वृत्त फेटाळले.
मागच्या वर्षी बारावीची परीक्षा पूर्ण झाली होती. दहावीचे काही पेपर झाले होते. यंदाही आपल्याला काही गोष्टींचा विचार यासाठी करावा लागेल. दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे असतात. एकीकडे कोरोनाचा धोका आणि दुसरीकडे परीक्षांचे टेन्शन आहे. परंतु दहावी, बारावीची परीक्षा घेणे आवश्यक आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
गायकवाड म्हणाल्या की, “तामिळनाडूने काय निर्णय घेतला याची माहिती काहींनी मला दिली. त्या वेळी मी त्यांना सांगितले की, मागील वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. तेव्हा पहिली ते आठवी तसेच नववी आणि अकरावीची परीक्षा झाली नव्हती. अशा वेळी आपण मागच्या वर्षी जो निर्णय घेतला होता, तसाच निर्णय यंदा विचार करून घ्यावा लागेल.
दहावीची मुले पुढे अकरावीला अॅडमिशन घेणार आहेत. बारावीची मुले प्रोफेशनल कोर्ससाठी अॅडमिशन घेतील. अशा वेळी त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी परीक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द केल्याचे कोणतेही वक्तव्य मी केलेले नाही, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.