इंफाळ पश्चिम – मणिपूरमधील प्रशासन व्यवस्थेत बदल करून या राज्यातील भ्रष्टाचाराचे आम्ही समूळ उच्चाटन करू अशी ग्वाही भाजपचे ज्येष्ठ नेते व देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. मणिपूरमधील लांगथाबल येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना संरक्षणमंत्री म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारच्या कोणत्याही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कोणीही करू शकले नाही.
आम्हाला व्यवस्थेत बदल घडवून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करायचे आहे त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असे ते म्हणाले. मणिपूरमध्ये भाजप सत्तेत आल्यापासून राज्यात समग्र विकास झाला आहे. भाजप सरकारच्या काळात या भागातील रस्ते, रेल्वे आणि हवाई संपर्क सुधारला आहे, असा दावाही राजनाथसिंह यांनी यावेळी केला.