पाटणा – केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधी पक्षांची दोन दिवसांची बैठक कर्नाटकच्या बंगळूरू येथे संपन्न झाली. ही बैठक संपल्यावर नितीश कुमार तातडीने कर्नाटकातून बाहेर पडल्यामुळे चर्चांना तोंड फुटले असून त्यावरून विविध तर्क लढवले जात आहेत.
कोणत्यातरी गोष्टीवरून नितीश यांचे बिनसले असून ते नाराज झाले असल्याचे दावेही करण्यात आले आहेत. विरोधकांच्या महाआघाडीचे इंडिया हे जे नामकरण करण्यात आले आहे ते नितीश यांना रूचले नसल्याचे एक कारणही नितीश यांच्या नाराजीमागे असल्याचे सांगितले जाते आहे.
सगळ्यांशी चर्चा करण्यापूर्वीच आणि प्रस्ताव न मांडताच हा निर्णय घेतला गेला हे नितीश यांना रूचले नाही. त्यामुळे ते कोणाशीही न बोलताच बंगळुरूतून रवाना झाले. मात्र नितीश यांच्या पक्षाकडून हे दावे फेटाळण्यात आले आहेत. स्वत: नितीश यांनीही राजगिर येथील कार्यक्रमात माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन याबाबत खुलासा केला आहे.
बैठकीतील सगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतरच आपण तेथून परत आलो असे त्यांनी म्हटले आहे. देशाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. बैठकीत आपण जे मुद्दे ठेवले होते ते सगळे मान्य केले गेले आहेत आणि आता 2024 ची लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रितपणेच लढणार आहोत.
हे येणारे वर्ष विरोधी पक्षांसाठी फार चांगले राहणार आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली. नितीश यांच्या पक्षाचे नेते लल्लन सिंह म्हणाले की, नितीश कुमार यांनीच सगळ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना एकत्र केले आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही.