देशात डेंग्यूचे वाढते रुग्ण हे आरोग्य विभागासमोरील मोठे आव्हान ठरत आहे. भारतातील प्रत्येक राज्यांत डेंग्यू थैमान घालतो. ठिकठिकाणच्या रुग्णालयात डेंग्यूंचे रुग्ण वाढल्याने सोशल मीडियावर प्लेटलेट्सची मागणी करणाऱ्या मेसेजची संख्या देखील तितकीच वाढते. वास्तविक डेंग्यू झाल्यानंतर रुग्णांतील प्लेटलेट्स बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि प्लेटलेट्सची संख्या खूपच कमी झाली तर जीवाला धोका निर्माण होतो. दिल्लीत तर यंदा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही गतवर्षीच्या तुलनेत विक्रमी मानली जात आहे.
दिल्ली महानगरपालिकेच्या मते, दिल्लीत सप्टेंबर महिन्यांत डेंग्यूचे 693 रुग्ण आढळून आले तर ऑक्टोबर महिन्यांत एक हजारापेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. ही संख्या 2017 नंतरची सर्वाधिक आहे. दिल्लीत आतापर्यंत डेंग्यूचे 2200 पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर मलेरियाचे रुग्ण देखील वाढत चालले आहेत. देशातील अन्य भागात डेंग्यूची स्थिती चिंताजनक आहे. डेंग्यूचा प्रकोप हा पूर्वीपेक्षा अधिक भयंकर असून तो आणखीच व्यापक होत चालला आहे. कारण, डेंग्यूबरोबरच रुग्णाला मलेरियाची लागण होत आहे. दोन्ही आजारांनी एकाचवेळी हल्ला केल्याने रुग्णाची स्थिती अधिकच गंभीर होताना दिसत आहे.
देशात डेंग्यूचे हजारो रुग्ण आढळून येत असतानाही जवळपास सर्वच राज्यांत ठिकठिकाणी साचलेला कचरा आणि घाण याची योग्य रितीने विल्हेवाट होताना दिसून येत नाही. अनेक रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव असल्याने डासांचे वाढलेले प्रमाण दिसून येत आहे. साफसफाई नियमित होत नसल्याने आणि स्वच्छता होत असली तरी ती योग्य रीतीने केली जात नसल्याने रुग्णाची मानसिकता आणखीच बिघडते.
प्रशासकीय निष्काळजीपणा सर्वश्रुत आहे. कोणताही आजार पसरला की जबाबदारी झटकण्याची चढाओढ लागते. वास्तविक डेंग्यू दरवर्षी येतो. मात्र दर तीन ते चार वर्षांच्या खंडानंतर जेव्हा डेंग्यू महासाथीचे रूप धारण करतो तेव्हा सरकार आणि स्थानिक प्रशासन कुंभकर्णी झोपेतून खडबडून जागे होते. जनजागृती मोहीम सुरू केल्या जातात, फवारणी सुरू होते; परंतु तोपर्यंत डेंग्यूने थैमान घातलेले असते. डेंग्यू हा व्हायरल आजार आहे. तो आपल्या घराजवळ साचलेल्या पाण्यात वाढतो. एडिस नावाचा डास चावल्यानंतर डेंग्यू होतो. काळ्या रंगाचा स्पॉटेड डास असून तो दिवसा चावतो. डेंग्यूचा संसर्ग शरीरात गेल्यानंतर तो थेट रोगप्रतिकारशक्तीवरच हल्ला करतो. वेळीच या डासांचा नायनाट केला तरच या आजारापासून आपला पूर्ण बचाव होऊ शकतो.
लक्षणे
डेंग्यू दोन ते पाच दिवसांच्या आत गंभीर रूप धारण करतो. अशावेळी बाधित व्यक्तीला ताप येण्याचे थांबते आणि रुग्णाला बरे झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात स्थिती वेगळीच असते आणि ही स्थिती गंभीरही राहू शकते. अर्थात, डेंग्यू झाल्यानंतर शरीरात कोणकोणती लक्षणे दिसून येतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. काही लक्षणे वेगळी असू शकतात. खूप ताप येणे, घसा खवखव करणे, थंडी वाजणे, डोकेदुखी, थकवा, कंबर किंवा डोळे दुखणे, हिरड्यातून, मूत्र मार्गातून रक्त येणे, उलटी, मळमळ होणे, स्नायू आणि सांधेदुखी होणे, शरीरावर लाल चट्टे येणे, प्लेटलेटची संख्या घसरणे यासारख्या लक्षणाचा समावेश आहे.
खबरदारी आणि उपाय
आजार कोणताही असो, उपचारापेक्षा त्यापासून खबरदारी घेणे हे अधिक महत्त्वाचे ठरते. डेंग्यूच्या प्रकरणात बचाव हेच मोठे शस्त्र आहे. आपल्या घराजवळ आणि परिसरात डेंग्यूचा प्रसार होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. डेंग्यूची लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे तत्काळ जायला हवे आणि उपचार सुरू करणे गरजेचे आहे. रुग्णाला पौष्टिक आणि संतुलित आहार देणे गरजेचे आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, डेंग्यू झालेल्या रुग्णाला तुळस लाभदायी आहे. तुळशीची आठ ते दहा पाने ग्लासभर पाण्यात उकळावीत. पाणी निम्मे झाल्यानंतर ते पाणी रुग्णास द्यावे.
नारळाचे पाणी देखील द्यावे. यात इलेक्ट्रोलाइट्स असते. तसेच मिनरल्सचा देखील चांगला स्रोत म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. परिणामी शरीरातील रक्तपेशीची कमतरता भरून काढण्यासाठी मदत मिळते. याशिवाय पपईच्या पानांचा रस हादेखील प्लेटलेटस् वाढवण्यास उपयुक्त ठरतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गुळवेलासारखी वनौषधीही यामध्ये लाभदायक ठरते. व्हिटॅमिन सी देखील शरीराची इम्यून सिस्टिम चांगली राहण्यासाठी मदत करते. यासाठी आवळा, संत्रा, मोसंबी यासारखे व्हिटॅमिन सी युक्त भरपूर फळे रुग्णाला द्यावीत. कोणत्याही स्थितीत रुग्णाचा ताप वाढणार नाही, याची काळजी घ्यावी. मात्र अशा रुग्णास ऍस्प्रिन, ब्रुफेन आदी वेदनाशामक गोळ्या देऊ नयेत. कारण त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो.
देशात दरवर्षी डेंग्यूचा कहर पाहावयास मिळत आहे. डेंग्यूमुळे हजारो नागरिक आजारी पडतात. काहींचा दुर्दैवी मृत्यूदेखील होतो. दरवर्षी देशभरात डेंग्यूचे हजारो रुग्ण आढळून येतात. डेंग्यूचा फैलाव झाल्यानंतर प्रशासन आणि डॉक्टरांकडून सर्वसामान्य जनतेला काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जातात. गल्लोगल्ली फवारणी केली जाते. तरीही प्रारंभीच्या टप्प्यात असलेल्या डेंग्यूचा प्रसार होणार नाही याची काळजी घेण्यात मात्र निष्काळजीपणा दाखविला जातो. रुग्णालयातील अस्वच्छता ही रुग्णाला बरे करण्याऐवजी आणखी आजारी पाडण्याचे काम करते, तर प्रशासकीय हलगर्जीपणा हा आरोप प्रत्यारोपातून दिसून येतो. एकमेकांवर खापर फोडून जबाबदारीतून पळ काढणाऱ्या प्रशासनामुळे डेंग्यूसारखे साथजन्य आजार फैलावण्यास हातभार लागत आहे.