विसगाव खोरे, (पुणे) – कोल्हापूर पध्दतीच्या बंधारा दुरुस्तीसाठी 9.50 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकतीच बैठक झाली. या बैठकीत हा निर्णयाला तत्त्वतः मंजुरी देण्यात आले असल्याचे शिवतरे यांनी सांगितले. या बैठकीस पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रमोद काकडे, जिल्हा अधिकारी राजीवकुमार देशमुख, जलसंपदा विभाग कार्यकारी संचालक विलास राजपूत, जलसंपदा विभाग अधीक्षक अभियंता संजीव चोपडे उपस्थित होते.
भोर-वेल्हा तालुक्यातील गुंजवणी, कानंदी व नीरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती करण्यासाठी फेर अंदाजपत्रकासह 9.50 कोटी रुपांचा प्रस्ताव कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग, पुणे यांच्याकडे प्रलंबित होता. या दोन्ही तालुक्यांतील या नद्यांवरील प्रत्येकी 4 अशा एकूण 12 कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती करणे गरजेचे असल्यामुळे गेल्या 8 वर्षांपासून प्रयत्न सुरू असल्याची माहिती रणजित शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्याविषयी तत्कालीन मंत्री रामराजे निंबाळकर यांच्याकडे मागणी केली असता त्यावेळी अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु आज पर्यंत त्याला मंजुरी मिळाली नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जलसनपदा विभाग कार्यकारी संचालक विलास राजपूत यांना याबाबत तात्काळ मंजुरी देण्यासाठी आदेश दिले आहेत. जलसंपदा महामंडळाच्या पाणीपट्टी करातून उपलब्ध असलेल्या निधीतून या कामांना मंजुरी देता येईल, असे कार्यकारी संचालकांनी मान्य करून तत्वतः मंजुरी दिली आहे. याच बैठकीत गुंजवणी, कानंदी व नीरा नदीवरील उर्वरित बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामांना देखील मंजुरी द्यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे रणजीत शिवतरे यांनी सांगितले.
- 261 दशलक्ष घनफूट पाणी साठवण होणार
या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे प्रलंबित भोर तालुक्यातील नीरा नदीशेजारील अंदाजे 25 गावांचे 810 हेक्टर, गुंजवणी नदीशेजारील अंदाजे 15 गावांचे 1009 हेक्टर, तसेच वेल्हा तालुक्यातील कानंदी, गुंजवणी नदी शेजारील 26 गावांचे 1273 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. बंधाऱ्यांची दुरुस्ती होण्यामुळे 261 दशलक्ष घनफूट पाणी साठवण होणार असून, भोर, वेल्हा तालुक्यातील एकूण 3092 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.