मुंबई – मुंबई ड्रग्स तस्करी प्रकरणात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक झाल्यानंतर मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर आता नवाब मलिक यांची मुलगी नीलोफर खान यांनी एक खुले पत्र जाहीर करून एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईमुळे त्यांच्या कुटुंबाची बदनामी झाल्याचे म्हंटले आहे. त्यांनी यासंदर्भात सविस्तर पत्र लिहिले आहे.
‘आमच्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आले’
ट्विटरवर प्रसिद्ध झालेल्या या पत्रात निलोफर खान यांनी आरोप केला आहे की, ‘आमच्या कुटुंबाला ‘बहिष्कृत’ करण्यात आले आहे. ‘पेडलरची बायको’, ‘ड्रग स्मगलर’ असे शब्द आमच्यासाठी वापरण्यात आले. आमच्या मुलांनी मित्र गमावले आहेत. पती समीर खानच्या अटकेने संपूर्ण कुटुंबच मोडकळीस आले आहे.
निलोफर खान यांनी हे पत्र ट्विटरवर ‘An Open Letter From The Wife of An Innocent: The BEGINNING’ या नावाने प्रसिद्ध केले आहे.
An Open Letter From The Wife Of An Innocent: THE BEGINNING#OpenLetter #SameeeKhan #NiloferMalikKhan #SameerWankhede #JusticeForSameer #WeWontBackDown #justiceoverinjustice #nawabmaliksameer pic.twitter.com/CEyVwSGiyd
— Nilofer Malik Khan (@nilofermk) November 6, 2021
‘कार्यालयात बोलवून माझ्या पतीला अटक करण्यात आली’
निलोफर खान म्हणाल्या, ’12 जानेवारीला माझे पती समीर खान यांना त्यांच्या आईचा फोन आला. आईने सांगितले की एनसीबीने त्यांना उद्या कार्यालयात बोलावले आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते एनसीबी कार्यालयात पोहोचले तेव्हा तेथे मोठ्या संख्येने मीडियाचे प्रतिनिधी उभे होते. यामुळे त्रस्त होऊन मी खिडकीत हात मारला, त्यामुळे मला टाके पडले. ते 15 तास माझ्यासाठी आणि मुलांसाठी खूप त्रासदायक होते.’
‘दुसऱ्या दिवशी सुरक्षा रक्षकाने मला फोन करून सांगितले की, NCBची टीम आमच्या घराची आणि ऑफिसची झडती घेण्यासाठी आली आहे. मी तिथे पोहोचेपर्यंत ते आमच्या कार्यालयात शिरले होते. सामान इकडे तिकडे फेकून दिले आणि ऑफिसची बरीच शोधाशोध केली. तरीही तेथून त्यांना काहीच मिळाले नाही.
‘पुराव्याशिवाय तुरुंगात ठेवले’
पुराव्याशिवाय पतीला अनेक महिने तुरुंगात ठेवण्यात आल्याचा दावा निलोफर यांनी केला आहे. यामुळे आमच्या कुटुंबाला खूप त्रास झाला. समीरला अडकवण्यापेक्षा हा मोठा मुद्दा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबी टीमने 13 जानेवारीला अटक केली होती. एजन्सीने दावा केला होता की समीर खान यांनी 194.6 किलो गांजा खरेदी-विक्रीचा कट रचला होता. या प्रकरणात समीर खानसह अन्य 5 जणांनाही आरोपी करण्यात आले होते.
– समीर वानखेडेंना आर्यन ड्रग प्रकरणातून हटवलं
या घटनेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा पाऊस पाडला. त्यांच्या आरोपांनंतर, समीर वानखेडे यांना आता आर्यन खान ड्रग प्रकरणाच्या तपासातून काढून टाकण्यात आले असून या प्रकरणाच्या तपासासाठी एजन्सीने डीडीजीच्या नेतृत्वाखाली एक हायप्रोफाइल टीम तयार केली आहे.