नवी दिल्ली : गेल्या महिन्यात पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांनी जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाच्या आवारात जाऊन विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवला जाण्याची शक्यता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
जामियाच्या आवारतील हिंसाचाराच्या संदर्भात पथक पाठवले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास 17 जानेवारीपर्यंत केला जाणार आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकापुढे सुमारे 35 ते 40 विद्यार्थ्यांनी जबाब नोंदवले. आयोगाचे एसएसपी मंझील सैनी यांच्या नेतृत्वाखालील पथक विद्यापीठात मानवी अधिकाराचे उल्लंघन होत आहे का? याचा तपास हे पथक करत आहे. हा तपास 17 तारखेपर्यंत चालेल, असे सूत्रांनी सांगितले.
आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी विद्यार्थ्यांना बेकायदा अटक केल्याची तक्रार आयोगाकडे डिसेंबरमध्ये दाखल करण्यात आली. पोलिस ठाण्यात जखमी विद्यार्थ्यांना वैद्यकीय उपचार नाकारण्यात आले,असे या तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत आयोगाने पोलिसांच्या वर्तनाची चौकशी सुरू केली आहे.