भोपाळ – मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी दिलेले जेवणाचे निमंत्रण नाकारल्यामुळे मंत्र्यांनी थेट चित्रीकरणच थांबवल्याची बातमी आहे. विद्या बालन हिनं त्यांना पाठवलेलं जेवणाचं निमंत्रण नाकारल्यामुळंच त्यांनी तिला अशा पद्धतीनं उत्तर दिल्याचं म्हटलं जात आहे. पण, मंत्रीमहोदयांनी मात्र या सर्व चर्चा धुडकावून लावल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार शाह यांनी विद्याला जेवणासाठी बोलावलं होतं. पण, तिने त्यांचे बोलावणे नाकारले. ज्यानंतरच सदर मंत्र्यांनी वनक्षेत्रामध्ये चित्रीकरण करण्याचा परवानाच रद्द केल्याचे म्हटले जात आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार चित्रीकरण करण्यासाठी चित्रपटाच्या टीमच्या वाहनांना या वनक्षेत्रात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. एकिकडे यासंबंधीच्या चर्चा सुरू झाल्यानंतर मंत्र्यांनी मात्र आपण स्वत:च विद्याच्या जेवणासाठीच्या बोलवण्यास नकार दिल्याचा दावा केला आहे.
‘बालाघाट येथे मी चित्रीकरणासाठी परवानगी मागणाऱ्यांच्या विनंतीवरुनच गेलो होतो. त्यांनी मला जेवणासाठी येण्याची विनंती केली. पण, मला सध्या हे शक्य नसल्याचं सांगत महाराष्ट्रात आल्यावर नक्की भेट घेईन असं मी त्यांना सांगितलं. जेवणाचा बेतच रद्द झाला. चित्रीकरणाचा नाही’, असं वक्तव्य या मंत्र्यांनी केल्याचं कळत आहे.
दरम्यान, या प्रकरणातील सत्य काय आहे, ते लवकरच बाहेर येईल. चित्रपटाच्या टीमकडून मात्र यासंदर्भात अद्याप कोणते भाष्य करण्यात आलेले नाही. विद्याच्या शेरनी या चित्रपटाचे सध्या मध्य प्रदेशात शूटींग सुरू आहे.